Sanjay Raut : महायुतीमध्ये मुंबईच्या महापौरपदासाठी प्रत्येकी साधारण सव्वा सव्वा वर्षाचा फॉर्म्युला झाला आहे. त्यानुसार आता मुंबईचे महापौरपद (Mumbai Mayor Post) शिंदे गटाला मिळणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ठाकरे गटाचे नेते, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या घडामोडींवर तीव्र टीका केली आहे.
“शिंदे यांना विकत घेतल्याशिवाय काहीच मिळत नाही. सत्ताही विकत घेतात. आता महापौरपद सव्वाशे कोटीला विकत घेतले, की सव्वा हजार कोटीला विकत घेतले याची मी माहिती घेत आहे. मला माहिती मिळेल, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे.
हा दावा संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना केला आहे. पुढे ते म्हणाले की, “मिंधे गटाचा इतिहास सत्ता विकत घेण्याचा आहे. सत्ता विकत घेण्यात ते बदनाम आहेत. सव्वा वर्षाचे महापौरपद विकत घेण्यासाठी सव्वाशे कोटी मोजले की सव्वा हजार कोटी मोजले याची माहिती मी घेत आहे.”
Sanjay Raut on Mumbai Mayor post
“त्यांना फुकट काही मिळत नाही. ते सर्वच विकत घेतात. त्यासाठी त्यांना पैसे मोजावे लागतात. दिल्लीतून किती खोक्यांना महापौरपद विकत घेणार हे कळेल. भाजपमधील मराठी महाराष्ट्र प्रेमी आहेत. ते सांगतीलच,” असे संजय राऊत म्हणाले.
यावेळी पत्रकारांनी संजय राऊत यांना शिंदे गटाबद्दल प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र मधेच थांबत ते म्हणाले की, “अरे काय रे शिंदे गट, अरे सोड रे शिंदे गट. अरे चोरच आहेत ना हे. अरे ही चोरांची टोळी आहे. ही गोल्डन गँग आहे. भाजप ही गोल्डन गँग आहे. शिंदेंचा गट ही कोब्रा गँग आहे. विषारी आहे. मुंबईत एक कोब्रा गँग होती. तशीही शिंदेंची गँग आहे.”
मराठी प्रेमी मंत्र्यांनी आवाज उठवला पाहिजे
मराठी भाषा शिकण्यासाठी रिक्षाचालकांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मुदतवाढ देण्यात आल्याचे राऊत यांच्या निदर्शनास आणून दिले असता, त्यांनी त्यावर भाष्यही केले.
“निवडणुका कोणत्याही असतील. पश्चिम बंगालच्या असतील, बिहार, गुजरात, कर्नाटकातील असतील. विषय मराठीचा आहे. निवडणुकांचा आणि याचा संबंध काय? म्हणजेच सरकारचा निर्णय मराठी माणसासाठी नसून हा निर्णय हिंदी भाषिकांसाठी घेतलेला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील सो कॉल्ड मराठी प्रेमी मंत्र्यांनी आवाज उठवला पाहिजे,” असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.
ही व्यवस्था आहे मुख्यमंत्री म्हणून…
पुढे संजय राऊत म्हणाले की, “फडणवीस यांना सहकारी पक्षांना सांगायचं आहे, मी तुमचा बॉस आहे. मी जे करीन ते पूर्व आहे. मुख्यमंत्री हा नेता असतो सरकारचा. त्यामुळे तुम्ही दिल्लीत कितीही फुगड्या घातल्या तरी मीच बॉस आहे. माझा निर्णय अंतिम राहील. हे त्यांनी काल दाखवून दिलं.”
“इतर काही विषयातही अशा प्रकारचे निर्णय घेतले. मग क्लस्टरचे असतील, बांधकाम व्यवसायातील असतील, कारण ते बॉस आहे. मुख्यमंत्र्यांना जेव्हा दिल्लीत जावे लागेल. तेव्हा त्यांचा जो माणूस मुख्यमंत्री म्हणून येईल त्याच्यासाठी ही व्यवस्था आहे मुख्यमंत्री म्हणून.” असा टोलाही राऊत यांनी लगावला.
संजय राऊत यांनी नेपाळला केंद्र सरकारकडून मदत केली जात असल्याचे समर्थन केले. “नेपाळमध्ये जो हाहाकार माजला आहे. नुकसान झाले आहे. एकेकाळचं हिंदूराष्ट्र आहे. तिथे आमच्याही श्रद्धा आहेत. आपले लोक तिथे जातात. मंदिरांना भेटी देतात. आपले लोकही तिथे फसले आहे. तिथे प्रचंड हाहाकार उडाला आहे.” असे राऊत म्हणाले.
“भारत सरकारने सर्वांना वाचवण्यासाठी मदत केली पाहिजे. मोठ्या प्रमाणावर केली पाहिजे. हा हाहाकार उडाला तो चीनमुळे झाला आहे. चीन वाचवू शकला असता. पण नेपाळशी आपलं नातं आहे. आध्यात्मिक आहे. धार्मिक आहे आणि राजकीय आहे. आपण त्यांना मदत केली पाहिजे,” असेही राऊत म्हणाले.
📌 महत्वाच्या बातम्या
- जरांगेंचा इशारा खरा ठरला? पुरावे असूनही ‘कुणबी’ रद्द; विद्यार्थिनीचे शिक्षण संकटात
- ‘तू कुठूनतरी अचानक येशील…’; रक्षाबंधनाच्या दिवशी सुप्रिया सुळेंना अश्रू अनावर, दिवंगत अजितदादांसाठी भावुक साद
- ‘हे देवेंद्र, हे नरेंद्र…’; समय रैनाचा सत्कार होताच सुनिल पाल भडकला, सरकारलाच विचारले खडे सवाल!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











