🕒 1 min read
मुंबई– तत्काळ तिकीट काढताना तुम्ही कधी तो अक्षरांचा ‘कॅप्चा’ टाईप करण्यात अडकला आहात आणि तोवर तुमचं कन्फर्म तिकीट थेट वेटिंगवर गेलंय? देशभरातील लाखो प्रवाशांना रोज येणारा हा मनस्ताप आता कायमचा भूतकाळ जमा होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची ही मोठी अडचण ओळखून आयआरसीटीसी (IRCTC) च्या तिकीट बुकिंग सुविधेत आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. अनावश्यक पॉपअप्स, जड ग्राफिक्स आणि वेळखाऊ कॅप्चा आता नव्या सिस्टीममधून थेट हद्दपार करण्यात आले आहेत. तिकीट बुकिंगची संपूर्ण प्रक्रिया सोपी आणि वेगवान करण्यासाठी नव्या संकेतस्थळाची एक ‘बीटा आवृत्ती’ लवकरच प्रवाशांच्या भेटीला येत आहे.
IRCTC Ticket Booking : नव्या वेबसाईटवर सेकंदात कन्फर्म होणार तिकीट
जयपूरच्या ‘मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या विद्यार्थ्यांनी या वेबसाईटमधील काही गंभीर त्रुटी रेल्वेच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत ही नवी सिस्टीम विकसित केली. नुकतेच जयपूरमध्ये या विद्यार्थ्यांसमोर नव्या प्लॅटफॉर्मचे सादरीकरणही पार पडले आणि त्यांचे अभिप्राय नोंदवून घेण्यात आले.
नव्या बदलानुसार आता प्रवाशांना सर्व वर्गांची म्हणजेच स्लीपर, एसीची माहिती एकाच स्क्रीनवर दिसेल. सोबतच स्वतःच्या आवडीची सीट निवडण्याची आणि ‘भाडे कॅलेंडर’द्वारे प्रवासाच्या स्वस्त तारखा शोधण्याची सोयही मिळणार आहे. त्यामुळेच वारंवार पेजेस बदलण्यात जाणारा प्रवाशांचा वेळ वाचेल.
सध्याच्या यंत्रनेत तत्काळ बुकिंग सुरू होताच लाखो युजर्स एकाच वेळी आल्यावर सर्व्हर स्लो व्हायचा. पण आता नव्या सिस्टीममध्ये प्रति मिनिट ३२ हजारांवरून थेट दीड लाख तिकिटे बुक करण्याची क्षमता असणार आहे. तसेच, प्रवाशांची आरक्षण चौकशी हाताळण्याची क्षमताही प्रति मिनिट ४ लाखांवरून थेट ४० लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
हे नवे संकेतस्थळ केवळ इंग्रजीपुरते मर्यादित न राहता विविध प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असेल. ग्रामीण भागातील प्रवासी आणि दिव्यांगांसाठी ही प्रणाली अधिक सुटसुटीत करण्यात आली आहे. विद्यार्थी आणि रुग्णांना सवलतीचे तिकीट काढण्यासाठी सर्व पर्याय आता एकाच जागी देण्यात आले आहेत.
दुसरीकडे, रेल्वेचे अधिकृत ‘RailOne’ ॲप ४ कोटी डाउनलोड्सचा टप्पा पार करून देशातील सर्वात मोठे तिकीट बुकिंग ॲप बनले आहे. तत्काळ बुकिंगच्या वेळी होणारा ‘बॉट्स’चा बेकायदेशीर वापर रोखण्यासाठी यावर आता विशेष सुरक्षा यंत्रणा बसवण्यात आली आहे.
या तांत्रिक बदलांसोबतच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेच्या रचनेत ५२ मोठ्या सुधारणांची घोषणा केली आहे. कंत्राटदारांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी आता कडक नियम लागू करण्यात आले आहेत. ज्या कंपन्यांवर त्यांच्या मालमत्तेच्या निम्म्याहून अधिक रकमेचे न्यायालयीन दावे प्रलंबित आहेत, त्यांना नव्या कंत्राटांसाठी थेट बंदी घालण्यात आली आहे.
प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कोळशाच्या राखेची वाहतूक आता उघड्या डब्यांऐवजी बंद कंटेनरमधून सक्तीची केली जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जमीन अधिग्रहणाचा वेग वाढवण्यासाठी ‘रेल्वे भूमी’ हे नवे पोर्टल सुरू करण्यात आले असून यामुळे रखडलेल्या प्रकल्पांचा वेळ ३० ते ४० टक्क्यांनी वाचणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘मी दोन-चार दिवसांत मरणार नाही’; सोनम वांगचुकांचा सरकारला थेट इशारा!
- २० सेंटीमीटरचं रेड कार्पेट अन् मोदींची खिल्ली; ऑस्ट्रेलियन टीव्हीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान
- ICC चा मोठा निर्णय: वनडे आणि टी-२० वर्ल्ड कपचा फॉरमॅट पूर्णपणे बदलला, आता सामने कसे होणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












