🕒 1 min read
दिल्ली– ‘ऑपरेशन टायगर’च्या नावाने रंगलेला राजकीय थरार खरंच यशस्वी झालाय की हा निव्वळ एक फुगा होता? ठाकरे गटाचे खासदार फुटल्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच आता या संपूर्ण प्रकरणाला एक अतिशय नाट्यमय वळण मिळालं आहे.
शिंदे गटाने कितीही दावे केले तरी आपला एकही खासदार फुटलेला नाही, असा थेट आणि खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. हिंमत असेल तर फुटलेले चेहरे अधिकृतपणे समोर आणा, असे खुलं आव्हानच त्यांनी शिंदे गटाला दिलं आहे. त्यांच्या या विधानामुळे दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंतचे राजकारण चांगलंच तापलं आहे.
‘ऑपरेशन टायगर’ फसले? अरविंद सावंतांचा मोठा दावा
माध्यमांशी बोलताना सावंत यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत शिंदे गटाचे सर्व दावे फेटाळून लावले. आमच्याकडे असलेले सर्वच्या सर्व नऊ खासदार आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच भक्कमपणे उभे आहेत, असे त्यांनी ठणकावून सांगितले. खोटा भ्रम पसरवला जात असून विनाकारण प्रामाणिक नेत्यांची नावे या बंडात गोवली जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
खासदार संजय दिना पाटील यांच्याशी आपलं स्वतः बोलणं झालं असून ते घरीच आहेत आणि ठाकरेंसोबतच असल्याचे सावंत म्हणाले. पण जेव्हा त्यांना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा आपला त्यांच्याशी अजून संपर्क झाला नसल्याची कबुली त्यांनी (Arvind Sawant) दिली.
उद्या आम्ही खासदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावली असून त्यासाठी सर्वांना व्हिप बजावण्यात आला आहे. या बैठकीला सर्व नेते उपस्थित राहतील आणि तेव्हाच सर्व चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. सुरुवातीला फुटणाऱ्यांचा आकडा सात सांगितला गेला, नंतर तो सहावर आला आणि आता हळूहळू हा आकडा कमीच होत असल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे, शिंदे गटाकडून मात्र हे ‘ऑपरेशन’ शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा अद्यापही केला जात आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत नेमकं काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ठाकरे गटाचे ‘ते’ ६ बंडखोर खासदार दिल्लीतून अचानक गायब; एकनाथ शिंदेंची रणनीती बदलली?
- पावसाची पुन्हा दगाबाजी! मान्सून थेट जुलैत धडकणार, विदर्भात उष्णतेचा अलर्ट
- घसा बसला, तरीही मंचावर; सोनू निगमला नेमका कोणता गंभीर आजार झालाय?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












