जालना: मराठा आंदोलनाला मदत करणाऱ्यांची सरकारकडून चौकशी लावली जात असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे हे ‘बाईच्या पदराआड’ लपून वार करत असून, आंदोलनाला त्रास देण्यासाठी त्यांचे अधिकारी शनिवारी आणि रविवारीही काम करत असल्याची जहरी टीका त्यांनी केली.
अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या जरांगे यांच्या उपोषणाचा आज १६ वा दिवस आहे. जरांगे त्यांच्या समर्थकांसह १५ सप्टेंबरला मुंबईकडे रवाना होणार असून, १९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता आझाद मैदानावर ते आमरण उपोषण सुरू करणार आहेत. त्यांचा पहिला मुक्काम पाटोदा आणि दुसरा मुक्काम श्रीगोंदा येथे असेल. पाऊस किंवा ऊन असले तरी मराठे मुंबईत धडकणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
Manoj Jarange criticizes Chandrashekhar Bawankule over Maratha reservation
मनोज जरांगे आझाद मैदानावरील आंदोलनावर ठाम
आंदोलनाला मदत करणाऱ्यांवरून सरकारला लक्ष्य करत जरांगे म्हणाले, “समाजाने मदत केली नाही तर आंदोलन कसे चालवायचे? मदतीचे हात पुढे येत असल्याने त्यांच्यामागे चौकशा लावल्या जात आहेत. बावनकुळे यांच्या मनात मराठ्यांविषयी किती द्वेष आहे, हे यातून समोर आले आहे. त्यांनी आमची सगळी संपत्ती घेतली तरी समाज आम्हाला तुकडे घालेल, आम्ही समाजासाठी तुरुंगवासही भोगू. पण बावनकुळे यांनी सावध राहावे, त्यांनाच हा फास बसेल.”
मंत्री उदय सामंत यांनी गणेशोत्सवाचा संदर्भ दिल्यावर प्रतिक्रिया देताना जरांगे यांनी सरकारवर ताशेरे ओढले. गेल्या वर्षापासून सरकारने काय केले, असा सवाल करत त्यांनी सरकारला निर्णय घेण्यासाठी आता आठ दिवसांची मुदत असल्याचे सुनावले. चौकशी करून आंदोलन थांबत नाही, तर ते अधिक वाढते, असे ते म्हणाले. श्रीमंत मराठ्यांनी आंदोलनाला मदत केली तर त्यात गैर काय? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी धनगर आणि बंजारा समाजाच्या मोर्चांचे उदाहरण दिले.
एकनाथ शिंदे यांना इशारा देताना जरांगे यांनी राजकीय गणितावर बोट ठेवले. “मराठ्यांनी शिंदे यांच्यावर विश्वास ठेवला, वाशीमध्ये त्यांचा सन्मान केला. पण जर देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या सर्व मागण्या मान्य करून बाजी मारली, तर मग मराठ्यांचे आणि फडणवीसांचे संबंध चांगले होतील. मग बाकीच्यांचे (शिंदे यांचे) काय होणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आझाद मैदानावरील आंदोलनासाठी रीतसर अर्ज केला असून, परवानगी द्यायची की अटी घालायच्या हे आता फडणवीस यांनी ठरवावे, असेही ते म्हणाले.
📌 महत्वाच्या बातम्या
- अभिजीत दिपके यांचा मध्य प्रदेशच्या ‘मुख्यमंत्री’ पदाचा राजीनामा; बालाघाटमधील वादानंतर सरकारला टोला
- सीबीआयची मोठी कारवाई; एक कोटींच्या लाचप्रकरणी CGST अधीक्षकासह सल्लागाराला अटक
- भोकरदन SDPO कार्यालयातील लॉ ऑफिसरला उच्च न्यायालयाचा दिलासा; कंत्राटी सेवा राहणार सुरू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











