🕒 1 min read
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य एकत्र येण्याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात ५ जुलै रोजी मुंबईत काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या निमित्ताने हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. मात्र, हा फक्त एक मोर्चापुरताच सहभाग असेल की भविष्यात ते राजकारणात कायमस्वरूपी एकत्र येतील, यावर तर्कवितर्क लावले जात आहेत. याच संदर्भात आता गायिका आशा भोसले ( Asha Bhosle ) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आर. डी. बर्मन यांच्या जयंतीनिमित्त आशा भोसले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आर. डी. बर्मन, लता मंगेशकर, अशोक कुमार अशा अनेक दिग्गजांच्या आठवणींना उजाळा दिला. मंगेशकर कुटुंबीयांचे ठाकरे कुटुंबाशी आपुलकीचे संबंध आहेत. त्यामुळेच, माध्यम प्रतिनिधींनी आशा भोसले यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबद्दल त्यांची भूमिका विचारली.
Asha Bhosle on Thackeray Reunion
या प्रश्नावर आशा भोसले यांनी स्पष्ट भूमिका घेतली. “मला राजकारणातले फक्त आशिष शेलार माहिती आहेत. इतर कुठलेही लोक माहिती नाही. माझा राजकारणाशी काहीही संबंध नाही. मला ( Asha Bhosle ) हे राजकारण नकोच आहे,” असे सांगत त्यांनी राजकारणापासून अलिप्त राहण्याची इच्छा व्यक्त केली.
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबद्दल चर्चा सुरू आहे, आणि त्यांच्याकडून केली जाणारी काही सूचक विधाने याला कारणीभूत ठरली आहेत. शिवसेनेच्या वर्धापन मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी “जे महाराष्ट्राच्या मनात आहे, तेच होईल,” असे विधान केले होते. तर राज ठाकरे यांनी “महाराष्ट्राच्या हितापुढे काहीही मोठं नाही, ५ जुलैला कळेल,” असे म्हटले होते. यामुळे हा केवळ हिंदी सक्तीविरोधातील मोर्चाच नाही, तर राजकीयदृष्ट्याही हे दोघे एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या एकत्र मोर्चाबाबत मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, “या सरकारला मराठी माणसाची ताकद दिसणे आवश्यक आहे. महाराष्ट्रावर हिंदी भाषेची सक्ती केली जात आहे. महाराष्ट्रातच मराठीची गळचेपी होत असेल, तर आपण सर्वांनी सरकारच्या अंगावर जाणे गरजेचे आहे. राज ठाकरे यांनी तशी भूमिका मांडली आणि आम्ही त्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राज्यात एकच मोठा मोर्चा निघावा असे राज यांनी म्हटले आणि आम्ही सगळे त्यांच्याबरोबर उभे आहोत.”
📌 महत्वाच्या बातम्या
- “रडत होते, पाया पडले… तरी त्याने बलात्कार केला!” लॉ कॉलेजमध्ये संतापजनक घटना
- लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, मोठ्या नेत्यासह तिघांना अटक
- राज्यातील ५१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे, मुंबईत मोठे फेरबदल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












