Pravin Darekar : मराठा समाजातील लोकप्रतिनिधींना देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्रे रद्द केल्यामुळे संतप्त झालेल्या मनोज जरांगे-पाटील यांनी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर कडाडून टीका केली. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या सांगण्यावरून मराठा समाजाची (Maratha Samaj) प्रमाणपत्रे रद्द केली गेली का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बावनकुळे इतके मोठे झाले का? फडणवीसांनी बावनकुळेंना एवढे अधिकार दिले का? अशी विचारणाही त्यांनी केली. फडणवीस यांनी विनाकारण मराठा समाजाला दुखावले आहे, असेही जरांगे म्हणाले. या टीकेला आता भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी थेट मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची अक्कलच काढली आहे. रस्त्यावर आणि नाक्यावर बसून आंदोलन करणे आणि सिस्टीममध्ये राहून काम करणे, यात खूप फरक असतो, असे म्हणत दरेकर यांनी जरांगे यांना टोला लगावला.
“कोणावरही आरोप करण्यासाठी फारशा बुद्धिमत्तेची गरज नसते. ज्यांना व्यवस्थाच समजून घ्यायची नाही, त्यांच्याबद्दल काय बोलावे? जात पडताळणी समितीला न्यायिक अधिकार असतात. त्यात कोणताही मंत्री हस्तक्षेप करू शकत नाही, मग लेखी सूचना देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काही त्रुटींमुळे नोंदी रद्द झाल्या असाव्यात. झोपलेल्या माणसाला उठवता येते, पण झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही,” असे दरेकर म्हणाले.
Pravin Darekar criticizes Manoj Jarange over Maratha Samaj
मनोज जरांगे-पाटील वारंवार अल्टिमेटम देत असतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. “महाराष्ट्र हे सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन चालणारे राज्य आहे. लोकांनी लोकांना एकत्र करण्यावर भर दिला पाहिजे, त्यांना विभागण्यावर नाही. मराठा आणि ओबीसी समाजांमध्ये संघर्ष निर्माण करणे हे राज्याच्या हिताचे नाही,” असेही दरेकर यांनी नमूद केले.
काल ‘अंतरवाली सराटी’ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे-पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना इशारा दिला होता. निवडणुकीत त्यांच्या आमदारांचा पराभव घडवून आणू. यावरही प्रवीण दरेकर यांनी भाष्य केले. “मनोज जरांगे-पाटील यांनी एखाद्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी. एकदा का ते विधिमंडळात आले की त्यांना सिस्टीमची समज येईल. रस्त्यावर आंदोलन करणे आणि सिस्टीममध्ये राहून काम करणे यात खूप मोठा फरक आहे. जर ते खरोखरच ५० आमदारांचा पराभव घडवून आणू शकत असतील, तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत,” असे दरेकर म्हणाले.
“आरोप करण्यासाठी फारशा बुद्धिमत्तेची गरज नसते. ज्या मंत्र्यामुळे त्रास होत आहे, त्यांचे नाव त्यांनी जाहीर करावे. आम्ही मराठा समाजाचे आहोत, तरीही आम्हाला कोणताही मंत्री त्रास देत नाही. उलट मुख्यमंत्री आम्हाला बळ देतात. बावनकुळे हे सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन चालणारे नेते आहेत. त्यांची प्रतिमा मलीन करणे अयोग्य आहे,” असे दरेकर यांनी म्हटले.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘संवाद झाला नाही तर आंदोलन होणारच’; मोहन भागवतांचे मोठे विधान
- शिवसेना चिन्ह लढाईत नवा ट्विस्ट; सुप्रीम कोर्टाच्या टिप्पणीने राजकीय चर्चांना उधाण
- ‘वडिलांसारखाच तुझा गेम वाजवणार’; राष्ट्रवादीच्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी













