पश्चिम बंगालच्या राजकारणात तृणमूल काँग्रेसमधील (TMC) अंतर्गत संघर्षाने एक नवीन वळण घेतले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षात निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर, अमडांगा मतदारसंघातील टीएमसी आमदार ‘पीरजादा’ कासिम सिद्दीकी यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वावरील आपला विश्वास पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. बंडखोर नेते ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटापासून स्वतःला दूर करत, त्यांनी पक्षात परतण्याचा निर्णय जाहीर केला.
विशेष म्हणजे, बंडखोर गटात सामील झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच सिद्दीकी यांनी आपली भूमिका बदलली आहे. फसवणूक करून काही कागदपत्रांवर आपली स्वाक्षरी घेतल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांना असे सांगण्यात आले होते की हा गट ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या नेतृत्वाखाली काम करेल, परंतु नंतर त्यांना असे समजले की त्या गटाच्या अजेंड्यात त्यांच्या नेतृत्वाचा कोणताही उल्लेख नव्हता.
Mamata Banerjee TMC political crisis
ममता बॅनर्जी यांनी राजकारणातून निवृत्त होण्याबाबतच्या चर्चेलाही स्पष्ट उत्तर दिले आहे. पश्चिम बंगालची सत्ता गमावल्यानंतरही आपण राजकीय मैदान सोडणार नाही, असे ममता बॅनर्जी यांनी ठामपणे सांगितले. भाजपला राजकीयदृष्ट्या मागे ढकलल्याशिवाय आपली लढाई थांबणार नाही, असा आक्रमक पवित्रा बॅनर्जी यांनी घेतला आहे.
“बीजेपी मला मीटिंग करण्याची परवानगी देत नाही. ज्यांना वाटतं की, फक्त मला परवानगी मिळत नाही, म्हणून मी राजकारणातून संन्यास घेईन, त्यांचा गैरसमज आहे. भाजपला स्वतः राजकीय निवृत्ती घेण्यास भाग पाडल्याशिवाय आमची लढाई थांबणार नाही.” असे स्पष्ट मत बॅनर्जी यांनी व्यक्त केले.
ममता बॅनर्जी यांनी पोलिसांच्या भूमिकेबाबतही गंभीर आरोप केले आहेत. “पोलीस टीएमसी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात आहे. पोलीस भाजपच्या दबावाखाली काम करत आहे. पोलीस अधीक्षक (SP) एखाद्या जिल्हाध्यक्षाप्रमाणे काम करत आहेत, तर पोलीस ठाणे प्रभारी (IC) भाजपच्या ब्लॉक अध्यक्षाप्रमाणे वागत आहेत.” असे बॅनर्जी यांनी सांगितले.
बॅनर्जी यांनी पुढे असाही दावा केला की, “१२,००० ते १४,००० लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही गद्दार आणि लुटारूंच्या मदतीने लोकांना भाजपमध्ये सामील होण्यासाठी भाग पाडले जात आहे.”
ममता बॅनर्जी यांची आक्रमक भूमिका आणि टीएमसी आमदारांचे पक्षात झालेले पुनरागमन यामुळे पश्चिम बंगालमधील राजकीय समीकरणांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘एकदातरी मराठी माणूस पंतप्रधान व्हावा’; विजय वडेट्टीवारांची इच्छा
- लाडक्या बहिणीसाठी पुन्हा इतर विभागांच्या तिजोरीवर डल्ला! सामाजिक न्याय विभागाचे ३४४ कोटी वळवले
- संभाजीनगर सत्र न्यायालयातील कॅन्टीन FDA च्या रडारवर? वकिलाच्या FDA कडे तक्रारीने खळबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











