🕒 1 min read
मुंबई– महानगरपालिकेवर भगवा कुणाचा फडकणार? या प्रश्नाचं उत्तर अजून पेटीत बंद असलं, तरी रस्त्यावरची लढाई मात्र शिगेला पोहोचली आहे. वरळीच्या ‘डोम’मध्ये महायुतीच्या तोफा धडाडल्या आणि टार्गेटवर होते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे बंधूंवर आतापर्यंतचा सर्वात बोचरा वार केला असून, थेट बाळासाहेबांची आठवण काढत विरोधकांना अक्षरशः झोडपून काढलं आहे.
निवडणुकीच्या तोंडावर एकत्र आलेल्या राज आणि उद्धव ठाकरेंवर टीका करताना शिंदे कडाडले. छत्रपती संभाजीनगरात इम्तियाज जलील यांच्या पक्षाशी संबंधित ‘रशिद मामू’ला तिकीट दिलं गेल्याचा संदर्भ देत शिंदे म्हणाले, “छत्रपती संभाजीनगरात यांनी रशिद मामूला तिकीट दिलं… आज जर बाळासाहेब असते तर यांना उलटं टांगून फटके दिले असते.” शिंदेंच्या या एका वाक्याने उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. जनतेने तुमचा ‘बँड’ वाजवल्यावर तुम्हाला आता ‘ब्रँड’ची आठवण झाली, पण खरा ब्रँड फक्त बाळासाहेबच आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
“तुम्ही आता मराठी माणसाचा पुळका आणताय, पण कोविड काळात बॉडी बॅगमध्ये घोटाळा करताना, आणि महापालिकेची कंत्राटं वाटताना तुम्हाला मराठी माणूस आठवला नाही का?” असा थेट सवाल शिंदेंनी उद्धव ठाकरेंना विचारला. काँग्रेससोबत जाण्याचं ‘पाप’ तुम्ही केलं, पण आता काँग्रेसनेही तुम्हाला लाथ मारली आहे, अशी टीका त्यांनी केली.
मुंबईला ‘स्थगिती सरकार’ नको तर ‘प्रगती सरकार’ हवं आहे. आम्हाला मुंबईला बकासुराच्या आणि भ्रष्टाचाराच्या मगरमिठीतून सोडवायचं आहे, असं सांगत शिंदेंनी आगामी निवडणुकीत महायुतीचाच विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. “आम्ही विकासाचे वारकरी आहोत, लोकांना विकासाचे मारेकरी नकोत,” असं म्हणत त्यांनी वरळीकरांना साद घातली.
📌 महत्वाच्या बातम्या
- “मी उद्धव ठाकरेंसारखा ‘बावळा’ नाही…”; आठवलेंच्या कवितेने वरळीत पिकली खसखस, शिंदेंचाही हल्लाबोल!
- रश्मी शुक्ला निवृत्त होताच काँग्रेसचा हल्लाबोल; फोटो शेअर करत लिहिले, “सत्ताधाऱ्यांचा True Caller…!”
- “राज ठाकरेंचं अस्तित्व संपणार…”; शहाजीबापूंचं ‘ते’ भाकीत आणि उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












