🕒 1 min read
मुंबई– मुंबई कुणासाठी थांबत नाही, असं म्हणतात. पण मुंबईचा विकास नक्की कुणामुळे थांबला आणि कुणामुळे धावला? हा प्रश्न आता २०२६ च्या महापालिका निवडणुकीच्या केंद्रस्थानी आला आहे. मुंबईकरांना सध्या एकच प्रश्न सतावतोय शहराला ‘गतिमान एक्सप्रेस’ मिळणार की विकासाला ‘ब्रेक’ लागणार?
आगामी निवडणुकीच्या (BMC Election 2026) पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात ‘विकासकामांच्या क्रेडिट’ची लढाई जुंपली आहे. सत्ताधारी महायुतीचा दावा आहे की, २०१४ ते २०१९ आणि २०२२ नंतरच्या काळात मुंबईतील इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांनी वेग घेतला. अटल सेतू, कोस्टल रोड आणि मेट्रोचं जाळे हे प्रकल्प मार्गी लागल्याचे दाखले दिले जात आहेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईचा चेहरामोहरा बदलल्याचा दावा सत्ताधारी करत आहेत.
मुंबई कोरोनाच्या संकटात होती, तेव्हा ‘खिचडी’ आणि ‘बॉडी बॅग’ घोटाळ्यांचे आरोप ठाकरे सरकारवर झाले होते. जलयुक्त शिवारपासून बुलेट ट्रेनपर्यंत प्रत्येक कामाला ‘स्थगिती’ देणे, हेच जणू तत्कालीन सरकारचे धोरण असल्याची टीका सत्ताधारी करत आहेत.
दुसरीकडे, विरोधकांच्या (मविआ) काळातील निर्णयांवरून सत्ताधारी पक्ष आक्रमक झाला आहे. २०१९ ते २०२२ या काळात मेट्रो-३ कारशेडचा वाद आणि इतर प्रकल्पांना दिलेल्या स्थगितीमुळे मुंबईचं नुकसान झाल्याचा आरोप केला जात आहे. “केवळ राजकीय साठमारीमुळे प्रकल्पांचा खर्च १० हजार कोटींनी वाढला,” असा दावा करत महायुतीने मविआला ‘स्पीडब्रेकर’ अशी उपमा दिली आहे. कोविड काळातील कामांवरूनही संशयाचे धुके निर्माण केले जात आहे.
नाण्याचा दुसरा पैलूही महत्त्वाचा आहे. विरोधकांकडूनही सत्ताधाऱ्यांवर मुंबईची लूट केल्याचा आणि कंत्राटदारांचे लाड केल्याचा आरोप होत आहे. मात्र, सामान्य मुंबईकरांसाठी वाहतूक कोंडी, लोकलचा प्रवास आणि रस्ते हेच जिव्हाळ्याचे विषय आहेत.
एका बाजूला पूर्ण झालेले मोठे प्रकल्प आहेत, तर दुसऱ्या बाजूला राजकीय कुरघोडीत रखडलेली कामं. त्यामुळे २०२६ मध्ये मुंबईकर नक्की कोणाच्या बाजूने कौल देणार? ज्यांनी ‘गती’चा दावा केला त्यांना, की ज्यांच्यावर ‘स्थगिती’चा ठपका आहे त्यांना? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाल्या, “आम्ही फक्त…”
- दानवेंची जीभ घसरली; भर सभेत राणे-साटम यांचा उल्लेख करत म्हणाले, “ही पिलावळ…साटम-झाटम”
- मुंबईचं घर सोडून तेजश्री प्रधान ठाण्यात का गेली? फडणवीसांसमोर मांडली व्यथा; ‘ट्रॅफिक’वर मिळालं असं उत्तर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












