पैठण | किरण काळे पाटील: तालुक्यातील मुदत संपलेल्या 79 ग्रामपंचायतींवर जिल्हा परिषद प्रशासनाने अखेर प्रशासकांची नियुक्ती केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकांचे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून गावचा कारभार रखडला होता. आता प्रशासकांच्या नियुक्तीमुळे प्रलंबित विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाला पुन्हा गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
संबंधित ग्रामपंचायतींची मुदत मागील वर्षीच संपली होती. निवडणुकांबाबतचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने प्रशासकीय पातळीवर निर्णय घेता येत नव्हते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्य शासनाने प्रशासक नियुक्तीचे निर्देश दिले. त्यानुसार राजपत्रातील अधिसूचनेची अंमलबजावणी करत जिल्हा परिषदेने या 79 ग्रामपंचायतींची सूत्रे प्रशासकांच्या हाती सोपवली आहेत.
Zilla Parishad appoints administrators for 79 Gram Panchayats in Paithan
पैठण ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती: विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा
प्रशासक नसल्याने गावातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, पथदिवे आणि गटारी यांसारख्या मूलभूत सुविधांची कामे खोळंबली होती. तसेच, ग्रामपंचायत निधीचा वापर आणि विविध शासकीय योजनांची अंमलबजावणीही थांबली होती. आता प्रशासकांच्या हाती निर्णयप्रक्रिया आल्याने उपलब्ध निधीचा नियोजनबद्ध वापर होईल आणि रखडलेली कामे तातडीने मार्गी लागतील, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. केवळ कागदोपत्री कामकाज न होता प्रत्यक्ष गावपातळीवर कामांना वेग मिळणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
या प्रक्रियेबाबत पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी राजेश कांबळे यांनी सांगितले की, “तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. प्रशासकांच्या माध्यमातून ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार सुरळीत होऊन विविध शासकीय योजना आणि विकासकामांच्या अंमलबजावणीला गती देण्याचा प्रयत्न केला जाईल.”
पंचायत समितीच्या सभापती वैशाली विनोद बोंबले यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली. “ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त झाल्यामुळे गावपातळीवरील विकासकामांना चालना मिळेल. नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर, उपसभापती संजय अशोक लघाने म्हणाले, “गेल्या काही काळापासून प्रशासकीय अडचणींमुळे ग्रामपंचायतींच्या कामकाजावर परिणाम झाला होता. आता प्रशासक नियुक्त झाल्याने विकासकामांना गती मिळेल आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचेल.”
📌 महत्वाच्या बातम्या
- जरांगे पाटलांची मुंबईत उपोषणाची घोषणा; परिस्थिती चिघळण्यापूर्वी सरकारने तोडगा काढावा, रोहित पवारांचा सल्ला
- भारतीय संघात दुखापतींचे सत्र; आशियाई स्पर्धेपूर्वी कर्णधार श्रेयस अय्यरची डोकेदुखी वाढली
- मनोज जरांगेंची मराठा महिलांना हाक: अमृता फडणवीस, लता शिंदेंना हळदी-कुंकू लावण्याचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











