Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या १५ दिवसांपासून अंतरवाली सराटीत उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आता मुंबईकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. २० सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाचा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी आंदोलनातील महिलांना आझाद मैदानावर न येता, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी जाण्याचा सल्ला जरांगेंनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांना हळदी-कुंकू लावण्याचं आवाहन त्यांनी महिलांना केलं आहे.
सौभाग्याचं लेणं असलेलं हळदी-कुंकू घेऊन मराठा महिला दारात गेल्या आणि त्यांनी ते स्वीकारलं नाही, तर ते कसले हिंदू? असा सवाल करत जरांगेंनी सरकारच्या हिंदुत्वावर थेट निशाणा साधला आहे. ‘लाडकी बहीण’ योजनांचा संदर्भ देत जरांगे म्हणाले की, फडणवीस आणि शिंदे या महिलांना उन्हात उभं करणार नाहीत; उलट त्यांना तिथे २५ लाख महिलांच्या जेवणाची सोय करावी लागेल. जर मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नींनी हे हळदी-कुंकू नाकारलं, तर जगभरात याची बातमी जाईल, असंही ते म्हणाले.
Manoj Jarange addressing Maratha community
मनोज जरांगेंचा मुंबई मोर्चा आणि आंदोलनाची पुढची दिशा
मुंबईकडे जाताना डोकं वापरून आणि अत्यंत शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केलं आहे. अंतरवालीतून निघणाऱ्या या मोर्चाला पोलिसांनी आणि गृहमंत्र्यांनी अडवू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जर पोलिसांनी जिथे अडवलं, तिथेच शांतपणे बसून राहण्याच्या सूचना त्यांनी आंदोलकांना दिल्या आहेत. मात्र, या दरम्यान आंदोलकांचं रक्त सांडलं, तर अवघ्या १५ मिनिटांत महाराष्ट्र बंद पडेल, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.
मनोज जरांगे यांचा हा मोर्चा १५ सप्टेंबरला अंतरवाली सराटीतून निघेल आणि त्यांचा पहिला मुक्काम बीडमधील पाटोदा येथे असेल. त्यानंतर १६ सप्टेंबरला अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यात, १७ सप्टेंबरला पुण्यातल्या हडपसरला आणि १८ सप्टेंबरला रायगडमधील खोपोलीत हा मोर्चा विसावेल. १९ सप्टेंबर रोजी आंदोलक मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचतील आणि त्यानंतर पुढचा लढा सुरू होईल.
📌 महत्वाच्या बातम्या
- मनोज जरांगेंचे आंदोलन खोटे; अजय बारसकरांचे आर्थिक व्यवहारांवरून गंभीर आरोप
- सुनील तटकरे कंपन्यांना ब्लॅकमेल करतायत; शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंचा गंभीर आरोप
- गृहमंत्र्यांना सांगतो, अंतरवालीपासून मुंबईपर्यंत कुठेही अडवायचं नाही, जिथं अडवाल तिथं…: मनोज जरांगे












