🕒 1 min read
मुंबई – राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही, पण सध्या एका ‘मिरची’वरून महाराष्ट्राचं वातावरण चांगलंच तापलंय! निमित्त ठरलंय ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिलेल्या एका स्फोटक मुलाखतीचं. निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत, “आम्ही टीका केली तर देवेंद्र फडणवीस यांना मिरचीची धुरी का लागली?” असा तिखट सवाल उपस्थित केला आहे.
राज्यात सध्या २९ महापालिकांच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकलं गेलंय. येत्या १५ जानेवारीला मतदान आणि १६ ला निकाल आहे. पण त्याआधीच ‘बिनविरोध’ निवडणुकांचा मुद्दा गाजतोय. सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीचे तब्बल ६० हून अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. नेमका हाच धागा पकडून ठाकरेंनी संशय व्यक्त केलाय.
ठाकरे म्हणाले, “जे लोक आत्तापर्यंत निवडून येत नव्हते, ते अचानक बिनविरोध कसे यायला लागले? हे सगळं धाक-दपटशाह आणि जोरजबरदस्तीने सुरू आहे.” इतकंच नाही तर, “बिनविरोध निवडणूक करायची असेल तर मग आमच्यापैकी एकही माणूस बिनविरोध का आला नाही? राहुल नार्वेकर तिथे का जातात?” असा बिनतोड सवालही त्यांनी उपस्थित केला. फडणवीस (Devendra Fadnavis) सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
ठाकरेंचा रोख फक्त राज्यापुरता नव्हता. त्यांनी अमित शहांच्या कार्यपद्धतीवरही बोट ठेवलं. शिंदेंची शिवसेना नसून तो केवळ ‘एसंशि’ (एकनाथ संभाजी शिंदे) गट आहे आणि ही अमित शहांची ‘तोडा, फोडा आणि राज्य करा’ ही कपटनिती असल्याचा घणाघात त्यांनी केला.
शेवटी फडणवीसांना चिमटा काढताना ठाकरे म्हणाले, “आत्ताच डोळ्यात मसाला गेलाय, आम्ही मिरच्या लावल्या तर यांना कुठे कुठे झाकावं लागेल ते पाहा!” त्यांच्या (Uddhav Thackeray) या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता या तिखट वार-पलटवाराचा निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम होतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- पुणेकरांसाठी अजितदादांचा ‘मास्टरस्ट्रोक’; लाडकी बहीण विसरा, आता मेट्रो आणि बसचा प्रवासही मोफत!
- “विराटचे वनडे रेकॉर्ड्स काहीच नाहीत?” मांजरेकरांचा पुन्हा ‘नवा’ वाद; म्हणाले, “१-२ नंबरला बॅटिंग करणं तर…”
- सारा तेंडुलकरचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पहिल्यांदाच बोलली अस्खलित मराठी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










