🕒 1 min read
नेपिडॉ: बंगालच्या उपसागरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. म्यानमारमधील अल्पसंख्याक रोहिंग्या (Rohingya) समुदायातील लोकांना घेऊन जाणाऱ्या दोन बोटी उलटल्या आहेत. या दुर्घटनेत ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू (500 Feared dead) झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. संयुक्त राष्ट्रांची मानवाधिकार परिषद (UNHRC) आणि ‘इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन’ (IOM) यांनी या जीवितहानीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार, या दोन्ही बोटी जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्यानमारच्या रखाइन राज्यातून निघाल्या होत्या. या बोटींमधून प्रामुख्याने रोहिंग्या निर्वासितांची ने-आण केली जात होती. त्यातील काही प्रवासी बांगलादेशातील सीमावर्ती भागातील निर्वासित छावण्यांतून आले होते. सुमारे २५० प्रवासी असलेल्या पहिल्या बोटीशी प्रवास सुरू झाल्यानंतर काही वेळातच संपर्क तुटला. २८० प्रवासी असलेली दुसरी बोट म्यानमारच्या अयेयारवाडी (Ayeyarwady) किनारपट्टीजवळ बुडाली.
मान्सूनच्या काळात खराब हवामान आणि उंच लाटांमुळे प्रवास अत्यंत धोकादायक बनत असल्याने रोहिंग्या निर्वासित सहसा सागरी मार्गांचा वापर टाळतात. UNHCR आणि IOM च्या मते, अलीकडील मुसळधार पाऊस आणि त्यामुळे आलेले पूर यामुळे सागरी प्रवासातील धोके आणखी वाढले होते. मृतांचा नेमका आकडा अद्याप निश्चित झालेला नाही आणि अधिकृत तपशीलही जाहीर झालेले नाहीत. तरीही, ही एक मोठी दुर्घटना असू शकते, असे संकेत या दोन्ही संस्थांनी दिले आहेत.
म्यानमारमधील सुरक्षा दलांनी केलेल्या भीषण हिंसाचारामुळे १२ लाख रोहिंग्या मुस्लिमांचे जीवन धोक्यात आले आहे. हा समुदाय म्यानमारमध्ये अल्पसंख्याक आहे. सध्या हजारो रोहिंग्या निर्वासित बांगलादेशात राहत असून त्यांना तेथील निर्वासित छावण्यांमध्ये आश्रय देण्यात आला आहे.
अमेरिका आणि इतर देश रोहिंग्यांना आर्थिक मदत पुरवतात. मात्र, अलीकडच्या काही महिन्यांत ही मदत कमी झाली आहे. परिणामी, बांगलादेशातील निर्वासित छावण्यांमध्ये अन्नाचा तुटवडा जाणवू लागला आहे. म्यानमारच्या रखाइन राज्यातील लष्कर आणि बंडखोर गट यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे परिस्थिती आणखी बिघडली आहे. म्यानमारमध्ये सध्या लष्करी राजवट आहे. सध्या म्यानमारमध्ये राहणाऱ्या रोहिंग्या लोकांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्यांना छावण्यांमध्येच मर्यादित ठेवण्यात आले असून त्यांच्यावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. गेल्या वर्षी, ६,५०० हून अधिक रोहिंग्यांनी सागरी मार्गाने देश सोडण्याचा प्रयत्न केला होता.
📌 महत्वाच्या बातम्या
- Kunal Kamra Controversy : कुणाल कामराचं ‘ते’ वक्तव्य ठरलं वादग्रस्त! अडचणीत वाढ
- MPSC विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! ऑनलाइन परीक्षा 2027 पर्यंत लांबणीवर
- सोनम वांगचुकांच्या उपोषणाला राज ठाकरेंचा पाठिंबा; मोदी सरकारवर सोडले टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












