🕒 1 min read
नागपूर: जुलै महिन्यातील वैशिष्ट्यपूर्ण हवामानाच्या स्थितीची चिन्हे दिसू लागली आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणात बदल झाले आहेत. हवामान विभागाने कोकण (Konkan) किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. बुधवारसाठी कोकण विभागातील मुंबईसह सहा जिल्ह्यांमध्ये ‘येलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Rain Alert)
भारतीय हवामान विभागाचा (IMD) अंदाज काय आहे?
बुधवारी पहाटे भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासोबतच मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. (Weather Update)
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागांत पावसाचे प्रमाण कमी होते आणि तापमानात, विशेषतः मुंबई महानगर क्षेत्रात, लक्षणीय वाढ झाली होती. मात्र, आता कोकण विभागात मान्सून पुन्हा सक्रिय होत असल्याचे संकेत मिळत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २० जुलैनंतर संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा सर्वदूर मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कुठे आणि कसा पाऊस पडणार?
बुधवारी पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. घाट माथ्यावरील काही भागांत सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात दिवसभर हलक्या सरींची शक्यता असून, १७ जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहेत. नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर तुलनेने अधिक असू शकतो, तर अहिल्यानगर जिल्ह्यात हलक्या सरींची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत १५ ते १६ जुलै दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. परभणी, बीड, लातूर, धाराशिव आणि हिंगोली जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे, तर नांदेड जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. विदर्भात हवामान कोरडेच राहणार
बुधवारी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे, तरीही काही भागांत हलका पाऊस पडू शकतो. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी हवामानविषयक कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. मात्र, हवामान विभागाने १६ जुलैनंतर या भागात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, आगामी आठवड्यातील मान्सूनची प्रगती विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही क्षेत्रांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण या दोन्ही भागांत जून आणि जुलैच्या पूर्वार्धात पावसाची तूट नोंदवली गेली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! सेवा नियमित करण्यासाठी शासन निर्णय जारी
- सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली; हायकोर्टाचे केंद्राला निर्देश
- Ashadhi Wari 2026: पंढरपुरात २४ तास विठ्ठल दर्शन; १५ जुलैपासून VIP दर्शन पूर्णपणे बंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












