🕒 1 min read
Prithviraj Chavan : अलीकडील पक्षांतराच्या घटनांवरून पक्षांतरबंदी कायद्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टीतील फुटीनंतर महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी पक्षांतरबंदी कायद्याबाबत मोठा दावा केला आहे. पक्षांतरबंदी कायद्यात 2003 मध्ये करण्यात आलेल्या बदलांबाबत दिवंगत माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली (Arun Jaitley) यांनी आपल्याला महत्त्वाची माहिती दिली होती, असा गौप्यस्फोट चव्हाण यांनी केला.
पक्षांतरबंदी कायदा आणण्यामागे मूळ उद्देश घोडेबाजार रोखणे हा होता, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी 1980 च्या दशकात हा कायदा आणला होता. त्यावेळी एक तृतीयांश आमदार किंवा खासदार फुटल्यास त्यांना मान्यता मिळत होती. मात्र, 2003 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि अरुण जेटली यांनी कायद्यात बदल करून दोन तृतीयांश सदस्यांची अट लागू केली, असे चव्हाण म्हणाले.
“अरुण जेटली यांनी मला स्वतः सांगितले होते की, दोन तृतीयांशची अट टाकल्यानंतर आता पक्षांतर होणार नाही. मात्र महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीमुळे त्यांच्या त्या शब्दांची आठवण येते,” असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. अलीकडील राजकीय घडामोडींवर टीका करताना त्यांनी शिवसेना ठाकरे गटातील खासदारांच्या पक्षांतराचा आणि यापूर्वी झालेल्या राजकीय बंडांचा उल्लेख केला. पक्षांतरामुळे लोकशाहीचे मोठे नुकसान होत असल्याचेही ते म्हणाले.
तसेच, पक्षांतरबंदी कायदा रद्द करून नवीन कठोर कायदा आणण्याची मागणी त्यांनी केली. “पक्ष बदलला तर थेट राजीनामा द्यावा लागला पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली. पक्षांतर प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. प्रलंबित प्रकरणांवर वेळेत निर्णय न झाल्यामुळे लोकशाहीची हानी झाल्याचे त्यांनी म्हटले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील पक्षांतराच्या राजकारणावर पुन्हा एकदा चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- 8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; DA वाढीची शक्यता!
- पहिल्या रांगेतील खुर्चीवरून वाद; अभिमन्यू पवारांना मेधा कुलकर्णींचं प्रत्युत्तर, म्हणाल्या ‘आत्मपरीक्षण करा’
- Ketan Agrawal Death Case: मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; उज्ज्वल निकम यांची एन्ट्री













