🕒 1 min read
हिंगोली : शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हिंगोली येथील सभेत भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) यांच्या रणनीतीवर गंभीर आरोप केले. शिवसेनेतून फुटलेले खासदार भाजपमध्ये न जाता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पक्षात का गेले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “खासदार फुटले, मात्र ते भाजपमध्ये गेले नाहीत, हे मोठं कोडं आहे. काल योगायोगाने मुख्यमंत्री आणि मी एकाच विमानातून प्रवास केला. पत्रकारांनी चर्चेबाबत विचारले असता मी सांगितले की, ही ढगांच्या वरची उच्चस्तरीय चर्चा होती. मात्र हे ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) नसून ‘ऑपरेशन देवेंद्र’ असल्याची मला शंका आहे.”
‘ऑपरेशन देवेंद्र’चा उद्धव ठाकरेंचा दावा
महाराष्ट्रातील राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना भविष्यातील मोठ्या भूमिकेपासून रोखण्यासाठी काही राजकीय हालचाली केल्या जात असल्याची उद्धव ठाकरे यांना शंका आहे. पुढे ते म्हणाले, “त्यांना वाटत असेल की भविष्यात देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ शकतात, त्यामुळे त्यांचे राजकीय पंख कापण्यासाठी महाराष्ट्रातील नेतृत्वाला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवसेनेचे खासदार फोडून त्यांना शिंदे गटाकडे पाठवले जात आहेत, असा माझा आरोप नसून माझा समज आहे.”
‘खासदार फोडण्यामागे भविष्यातील राजकीय गणित’
उद्धव ठाकरे यांनी पुढे म्हटले की, सध्या कोणतीही निवडणूक नसताना शिवसेनेचे खासदार फोडण्याची गरज काय होती? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
“जर खासदार स्वतःकडे ठेवायचे नव्हते, तर त्यांना दुसऱ्या गटाकडे का पाठवले? भविष्यात पंतप्रधान पदासाठी मतदानाची वेळ आली तर हे खासदार कोणाच्या बाजूने उभे राहतील, याची ही तयारी असू शकते,” असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.
‘बहुमतासाठी पक्ष फोडण्याचे राजकारण’
उद्धव ठाकरे यांनी पक्षांतर आणि बहुमताच्या राजकारणावरही भाष्य केले. ते म्हणाले की, दोन तृतीयांश बहुमताच्या नावाखाली पक्ष फोडले जात आहेत. “निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही म्हणून वेगवेगळ्या मार्गांनी ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. संविधान बदलण्याच्या दिशेने ही पावले आहेत का, असा प्रश्न निर्माण होतो.”
हे सर्व राजकीय डावपेच दोन तृतीयांश बहुमत मिळवण्याच्या उद्देशाने सुरू असल्याचा उद्धव ठाकरे यांना संशय आहे. “भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नाही, 240 जागांवरच समाधान मानावे लागले. त्यामुळे पुढील रणनीती आखली जात आहे,” असा दावा त्यांनी केला.
तसेच उद्धव ठाकरे यांनी संविधान बदलाच्या मुद्द्यावरूनही सरकारवर निशाणा साधला. महिला आरक्षणाच्या नावाखाली आणल्या जाणाऱ्या डिलिमिटेशनच्या प्रस्तावामुळे देशातील राजकीय समीकरणे बदलू शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. “जर डिलिमिटेशन झाले तर उत्तर भारतातील राज्यांचे वर्चस्व वाढेल आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांच्या मताला महत्त्व कमी होईल,” अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- 1 July New Rules: खिशावर परिणाम करणारे 5 मोठे बदल; जाणून घ्या नवीन नियम
- RBI Big Update: 2005 पूर्वीच्या जुन्या नोटांबाबत मोठी माहिती; नोटा बंद होणार का?
- ‘वेलकम टू द जंगल’चा बॉक्स ऑफिसवर धमाका; पहिल्याच दिवशी केली कोट्यवधींची कमाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












