🕒 1 min read
Explained BMC Election 2026– मुंबई कुणाची? या प्रश्नावर आपण घसा फोडून ओरडतो, “मुंबई मराठी माणसाची!” पण थांबा… खरोखर आज मुंबईत मराठी माणूस उरलाय कुठे? ‘संयुक्त महाराष्ट्रा’साठी १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिले, पण आज त्याच मुंबईत मराठी अस्तित्वाची लढाई खेळावी लागतेय. गेल्या २५-३० वर्षांत मुंबई महानगरपालिकवर (BMC Election 2026) एकहाती सत्ता गाजवणाऱ्या शिवसेनेने मराठी माणसाला काय दिलं? हा प्रश्न आता केवळ राजकीय राहिलेला नाही, तर तो प्रत्येक मराठी घराचा उद्वेग बनलाय.
Marathi Manoos BMC Election 2026
मराठी माणूस एकेकाळी लालबाग, परळ, दादर आणि गिरगाव म्हणजे मुंबईचं ‘हृदय’ मानलं जायचं. गिरणी कामगारांच्या घामावर हे शहर उभं राहिलं. पण गेल्या अडीच दशकात चित्र पालटलं आहे. गिरण्यांच्या चिमण्या विझल्या आणि तिथे काचेचे गगनचुंबी टॉवर्स उभे राहिले. या विकासात मराठी माणसाला घर मिळेल, असं आश्वासन दिलं गेलं होतं, पण घर काही मिळाले नाही.
पुनर्विकासाच्या आणि ‘मेंटेनन्स’च्या नावाखाली मूळच्या मुंबईकर मराठी माणसाला शहरातून अक्षरशः हद्दपार केलं गेलं. ज्यांच्या जीवावर शिवसेनेने राजकारण केलं, तोच मराठी माणूस आज दक्षिण मुंबईतून फेकला जाऊन थेट विरार, बदलापूर, कसारा आणि कर्जतच्या लोकलमध्ये लोंबकळताना दिसतोय. रोजचे ४-५ तास प्रवासात घालवणाऱ्या या चाकरमान्यांच्या वेदना सत्तेच्या कॉरिडॉरपर्यंत पोहोचल्याच नाहीत.
५० हजार कोटींचे बजेट, पण मराठी कंत्राटदार कुठे?
मुंबई पालिकेचं वार्षिक बजेट ५० हजार कोटींच्या घरात आहे. गेल्या २५ वर्षांचा हिशोब लावला तर हा आकडा लाखो कोटींत जातो. पण या अवाढव्य पैशातून किती ‘मराठी उद्योजक’ किंवा कंत्राटदार मोठे झाले?
रस्ते असोत, पुलांची कामं असोत वा नालेसफाई; कंत्राटं कोणाला मिळाली, हे वेगळं सांगायला नको. मराठी तरुणाला केवळ ‘वडापाव’ आणि ‘भजी’ विक्रीपुरतं मर्यादित ठेवून, आर्थिक नाड्या मात्र विशिष्ट धनदांडग्यांच्या हातात दिल्या गेल्याचा गंभीर आरोप आता विरोधक करत आहेत. जर सत्ता मराठी हितासाठी होती, तर ‘टॉप १०’ श्रीमंत कंत्राटदारांमध्ये एकही मराठी नाव का नाही?
अस्मितेचा केवळ राजकीय वापर?
निवडणुका आल्या की ‘मराठी अस्मिता’ आणि ‘मुंबईवर घाला’ हे शब्दप्रयोग बाहेर येतात. हे भावनिक राजकारण वर्षानुवर्षे चाललं. पण वास्तव काय आहे? एका बाजूला पालिकेच्या मराठी शाळा बंद पडत आहेत, तर दुसरीकडे इंग्रजी शाळांचं पीक फोफावलंय. मराठी भाषेचा वापर केवळ मतांसाठी झाला का?
आता पुन्हा एकदा निवडणुकांचे वारे वाहू लागलेत. सत्ता हातातून जाण्याची भीती निर्माण झाली की पुन्हा ‘मराठी बाणा’ आठवतो. पण आता मतदार राजा शहाणा झालाय. २५ वर्षांत ‘मराठी टक्का’ का घसरला आणि मराठी माणूस मुंबईबाहेर का फेकला गेला, याचा जाब आता तरुण पिढी विचारतेय. केवळ भाषणांनी पोट भरत नाही, हे आता जनतेला कळलंय. त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरेंना आणि मराठी अस्मितेवरुण राजकारण करणाऱ्या राजकारण्यांना कड़व्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील.
📌 महत्वाच्या बातम्या
- नाव बदललं, भाषा बदलली, बापाचं नावही खोटं; ३४ वर्षांनी ‘असा’ अडकला बायकोचा खुनी!
- ‘आलास का रे ब्रुस ली?’; मातोश्रीवर बाळासाहेब कोणाला म्हणायचे ‘असं’? अमित ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट!
- ‘शरद पवार सिंह, अजितदादा वाघ, आम्ही लांडग्यांकडे…’; मिटकरींचा महेश लांडगेंवर ‘विखारी’ वार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












