Sanjay Raut | “विधिमंडळाविषयी माझ्या भावना अत्यंत बहुमोल”; ‘चोरमंडळा’च्या वक्तव्यावर संजय राऊत यांची सारवासारव

Sanjay Raut | मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी ‘विधिमंडळ नव्हे चोर मंडळ आहे’, असं धक्कादायक वक्तव्य केलं होते. त्याचे तीव्र पडसाद विधानसभा अधिवेशनातही उमटले. सत्ताधाऱ्यांनी हा मुद्दा लावून धरत संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. या वक्तव्याबाबत संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. तसेच विरोधकांच्या हक्कभंगाच्या कारवाईच्या मागणीबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे.

संजय राऊतांचे स्पष्टीकरण (Sanjay Raut’s Clarification)

“मी काय म्हणालो होतो, हे समजून घेतलं पाहिजे. विरोधकांना देशद्रोही म्हटलं जातं. ज्याप्रकारे शिवसेना आणि धनुष्यबाणाची चोरी करून काही लोक विधिमंडळामध्ये गेले. त्यांनी सरकार स्थापन केलं आणि आमच्यावर ते हल्ले करत आहेत. विधिमंडळाबाहेर त्यांचा उल्लेख चोर, दरोडेखोर केला जातो. ही लोकभावना आहे. त्यांना उद्देशून मी ते वक्तव्य केलं होते. खरं तर माझ्यामुळे नाही तर या लोकांमुळे आज विधिमंडळाची बदनामी होत आहे”, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं आहे.

“विधिमंडळाविषयी माझ्या भावना अत्यंत बहुमोल”

“माझी ही भूमिका त्यांच्या विरोधात होती, ज्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण चोरला, ज्यांनी बाळासाहेबांचं स्वप्न चोरण्याचा प्रयत्न केला. मुळात हा विषय त्यांच्या पुरता मर्यादित आहे. त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मी त्यांच्या विषयी ते वक्तव्य केलं होते. ज्या विधिमंडळाने मला राज्यसभेत पाठवलं, ज्या विधिमंडळाने शिवसेनेला सत्ता दिली. त्या विधिमंडळाविषयी माझ्या भावना अत्यंत बहुमोल आहेत”, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

“मी विधिमंडळाचा अपमान केला नाही”

“यासंदर्भात माझी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा झाली आहे. मी विधिमंडळाचा अपमान केला नाही. मला तो अपमान करायचाही नाही. मला या सभागृहाचं महत्त्व माहिती आहे. पण गेल्या सहा महिन्यापासून हे सभागृह चोरमंडळाने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवरून जनतेचं लक्ष हटवण्याचा हा प्रयत्न आहे”, असा आरोपही संजय राऊत केला आहे.

काय होतं संजय राऊतांचं वक्तव्य?

संजय राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी ‘विधिमंडळ नाही, चोरमंडळ’ असा शब्द प्रयोग केला आहे. “ही बनावट शिवसेना आहे. ड्युप्लिकेट. चोरांचं मंडळ. चोर मंडळ. हे विधीमंडळ नाही, चोरमंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरून काढलं तरी आम्ही पक्ष थोडीच सडणार आहे. आम्ही पक्षातच राहणार आहोत. अशी पदे आम्ही ओवाळून टाकतो”, असं संजय राऊत म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.