Uddhav Thackeray | शेतकरी गारपिटीमुळे बेजार अन् सरकार राज्यातून पसार; ठाकरे गटाचं टीकास्त्र

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: ऐन हिवाळ्यामध्ये देशात बहुतांश ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यामध्ये देखील अनेक भागात पावसाने हजेरी लावली.

यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकरी संकटात असताना राज्य सरकार निवडणुकांच्या प्रचारामध्ये व्यस्त असल्याचं दिसून आलं आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं ( Uddhav Thackeray ) आजचा सामना अग्रलेखाच्या माध्यमातून सरकारवर खोचक शब्दात टीकास्त्र चालवलं आहे. राजा मस्त आणि प्रजा त्रस्त, शेतकरी बेजार आणि सरकार पसार अशी स्थिती महाराष्ट्रात यापूर्वी कधीच नव्हती, असं आजच्या सामना अग्रलेखात  ( Uddhav Thackeray ) म्हटल आहे.

Read Samana Editorial

तेलंगणा व जयपुरातील निवडणुकीत भाजप उमेदवारांना खोके पोहोचविण्याचे काम राज्यातील गद्दार हृदयसम्राटांना देण्यात आले होते.  निवडणुकांत खोके पोहोचविण्याची कामगिरी चोखपणे बजावणाऱ्या गद्दार हृदयसम्राटांनी अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्याने उद्ध्वर झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला मात्र पानेच पुसली.

कटकारस्थाने करून सत्तेवर आलेला नीरो रोम जळत असताना फिडल हे वाद्य वाजवत बसला होता आणि अवकाळीच्या संकटात शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना महाराष्ट्राचे आधुनिक नीरो निवडणूक प्रचारात रमले आहेत. राजा मस्त आणि प्रजा त्रस्त, शेतकरी बेजार आणि सरकार पसार अशी स्थिती महाराष्ट्रात यापूर्वी कधीच नव्हती.

महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, गारपिटीने कहर केला असून ‘मायबाप’ सरकार राज्यातून पसार झाले आहे. संकटात सापडलेल्या जनतेला आधार देण्यासाठी ‘सरकार’ असते म्हणून त्यास मायबाप म्हणायचे, पण महाराष्ट्रात चित्र उलटेच दिसत आहे.

पावसाळयातही झाले नाही असे विजांचे तांडव, ढगांचा भयंकर गडगडाट, तुफानी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्याने महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे.

अनेक जिल्ह्यांतील शेती व शेतमाल उद्ध्वस्त झाला आहे. शेतशिवारांमध्ये सर्वत्र पाणी साचले आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार या भागांमध्ये हजारो हेक्टरवरील पिके व फळबागांची भयंकर हानी झाली आहे.

त्यामुळे हतबल झालेल्या हजारो शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून राज्यातील मिंधे सरकार इतर राज्यांतील निवडणूक प्रचारात मशगुल आहे. अशा सत्ताधाऱ्यांना मायबाप कसे म्हणणार?

अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतात उभ्या असलेल्या कापसाच्या रोपांवरच वाती झाल्या आहेत. शेतकऱ्यांचे हे पांढरे सोने तीन दिवसांतील पावसाने पुरते नष्ट केले.

ज्वारीचे उभे पीकही आडवे झाले. नाशिक विभागात द्राक्षांच्या बागांचे तर अपरिमित नुकसान झाले. कांदा, टोमॅटो, केळी, पपईच्या बागा, ऊस, मका व नुकतेच डोके वर काढून तरारलेले गव्हाचे पीकही अवकाळीच्या तडाख्यात बरबाद झाले आहे.

केवळ मराठवाडा आणि विदर्भच नव्हे, तर कोकणापर्यंतच्या शेतशिवारांमध्ये या अवकाळीने हाहाकार माजवला आहे. कांद्याबरोबर इतर भाजीपाला, हरभरा व काढणीस आलेल्या भाताचेही या पावसाने मोठे नुकसान केले.

अवकाळी व गारपिटीच्या या तडाख्यात राज्यातील 17 जिल्ह्यांमधील हजारो हेक्टर शेती बाधित झाल्याचे राज्याच्या कृषिमंत्र्यांनीच सांगितले आहे.

अर्थात ही केवळ प्राथमिक माहिती आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार आणखी तीन-चार दिवस अवकाळी पाऊस व गारपिटीचे तडाखे असेच सुरू राहणार आहेत.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी निसर्गाचे असे काय घोडे मारले आहे कळत नाही, पण गेली काही वर्षे सातत्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेतो आहे.

ऐन पावसाळय़ात अवर्षणामुळे दुष्काळी परिस्थिती आणि पावसाळा संपल्यावर मात्र अवकाळी पाऊस व गारपिटीचे तडाखे असे दुहेरी संकट कोसळत आहे.

या सततच्या आपत्तींचा महाराष्ट्राच्या ग्रामीण ( Uddhav Thackeray ) जनजीवनावर अत्यंत वाईट परिणाम होतो आहे. जीव लावून, कष्ट करून, घाम गाळून पिकवलेली पिके व कर्जे काढून फुलवलेली शेतशिवारे व फळबागा डोळय़ांदेखत नेस्तनाबूत होत असताना शेतकऱ्यांना ज्या यातना व जे दुख होत असेल, त्याची कल्पनाही करवत नाही.

सततच्या या संकटांमुळे मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी खचला आहे. कधी सुदैवाने निसगनि साथ दिली आणि बंपर उत्पन्न झाले तर नेमके तेव्हाच या शेतमालाचे भाव कोसळतात आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, अशा बाता सरकार मारते; पण शेतकरी खरोखरच उत्पादन वाढवतो तेव्हा त्याच्या हाती काहीच उरत नाही ही वस्तुस्थिती आहे व त्यावर सरकारी पोपट काही बोलत नाहीत.

बाजारपेठेत नेण्याचाही खर्च निघत नसल्याने शेतकरी आला शेतमाल फेकून देत असताना, अतिवृष्टी व अवकाळी पावसाच्या तडाख्यात शेतमाल व बागा उद्ध्वस्त होत असताना वा दुष्काळामध्ये पिके करपून जात असताना जेव्हा शेतकरी संकटात सापडतो तेव्हा अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा ( Uddhav Thackeray ) देणे, शेतकऱ्यांना नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढणे हे सरकारचे कर्तव्य आहे.

मात्र कटकारस्थाने, लोकप्रतिनिधींची खरेदी-विक्री आणि निवडणूक प्रचारात रमलेले सरकार या कर्तव्यात कसूर करत असल्यामुळेच महाराष्ट्रात सातत्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत.

सरकारची बेपर्वाई व अनास्था यामुळे शेतकरी इतके देशोधडीला लागले आहेत की, अवयव विक्री करून गुजराण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील 10 शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापसाला भाव मिळत नसल्यामुळे किडनी, लिव्हर, डोळे व इतर अवयव विकत घेण्याची मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडेच केली आहे.

याच हिंगोली जिल्ह्याला आता अवकाळीचाही फटका बसला आहे. या संकटामुळे तिथे आता अवयव विक्रीसाठी रांगा लावण्याची वेळ येऊ नये, म्हणजे झाले.

राज्यातील तमाम शेतकरी वर्ग अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्याने आक्रोश करीत असताना राज्याचे मुख्यमंत्री व त्यांची बोगस महाशक्ती असलेले केंद्रीय सरकार कुठे आहे?

महाराष्ट्रातील शेती व शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना या संकटात त्यांचे अश्रू पुसण्यासाठी बांधावर जाण्याचे सोडून मिंधे सरकारचे मुख्यमंत्री तेलंगणात निवडणूक प्रचारात मग्न आहेत.

उपमुख्यमंत्री फडणवीसही कायम प्रचारातच गुंतले आहेत, तर अजित पवार हे कोमात आहेत. महाराष्ट्राचा ‘पालक’ असलेला शेतकरी संकटात असताना त्याला भेटण्याचे सौजन्य न दाखवता मुख्यमंत्री आपले ‘मालक’ असलेल्या पक्षाच्या प्रचाराला निघाले आहेत.

पालकाची काळजी सोडून मालकाची चाकरी करण्यात धन्यता मानणाऱ्या मिंध्यांना काय म्हणावे? परीट घडीचे पांढरेशुभ्र कपडे घालून तेलंगणात प्रचार करत असताना अवकाळीच्या तडाख्याने संकटात सापडलेला महाराष्ट्राचा शेतकरी आपल्याकडे मदतीसाठी आशेने बघतो आहे याचे भान नसेल तर यांना मुख्यमंत्री तरी कसे म्हणायचे?

तेलंगणा व जयपुरातील निवडणुकीत भाजप उमेदवारांना खोके पोहोचविण्याचे काम राज्यातील गद्दार हृदयसम्राटांना देण्यात आले होते.

निवडणुकांत खोके पोहोचविण्याची कामगिरी चोखपणे बजावणाऱ्या उद्दार हृदयसम्राटांनी अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला मात्र पानेच पुसली. ‘रोम जळत असताना, नीरो फिडल वाजवत होता’ अशी एक ऐतिहासिक म्हण आहे.

फरक इतकाच की, कटकारस्थाने करून सत्तेवर आलेला नीरो रोम जळत असताना फिडल हे वाद्य वाजवत बसला होता आणि अवकाळीच्या संकटात शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना महाराष्ट्राचे आधुनिक नीरो निवडणूक प्रचारात रमले आहेत. राजा मस्त आणि प्रजा त्रस्त, शेतकरी बेजार आणि सरकार पसार अशी स्थिती महाराष्ट्रात यापूर्वी कधीच नव्हती.

सौजन्य – सामना

महत्त्वाच्या बातम्या

 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.