मुंबई : आज (१ मे ) महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (Raj Thackeray) औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. ही सभा महाराष्ट्र सांस्कृतिक मैदानावर होणार असून या सभेसाठी राज ठाकरे कालच औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून यावरच शिवसेना नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अशा सुपारी सभा महाराष्ट्राने खूप बघितल्यात, अशी खोचक टीकाही देसाई यांनी केली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना सुभाष देसाई म्हणाले की,‘आधी मराठी-मराठी होतं, आता भोंगा-भोंगा आहे. मला माहित आहे की भुंगा आणि कमळाचं नातं होत. आता भोंगा आणि कमळाचं झालेलं आहे. पण हा भोंगा कमळाला किती त्रास देतो ते सुद्धा पुढच्या काळामध्ये कळेल. अशा सुपारी सभा महाराष्ट्राने खूप बघितल्यात आणि त्यामुळे हा विषय अजून किती दिवस टिकणार ते सुद्धा बघायला जनता आणि मी सुद्धा उत्सुक आहे.’ तसेच कुणी कितीही चिथावणीखोर वक्तव्य केली तरी जनता शांतता राखेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे बघायला मिळाले. तसेच राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. ही मुदत संपण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वी आज औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यामुळे या सभेत राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात आणखी काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “महाराष्ट्र स्थापनेस ६२ वर्षे झाली तरी मुंबई कुणाची?”, संजय राऊत यांचा सवाल
- “…हा महाराष्ट्राचाच अपमान”, पंतप्रधान मोदींवर संजय राऊत यांची टीका
- “महाराष्ट्राच्या भूगर्भात मुंबई तोडण्याबाबत…”, संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य
- राज ठाकरेंच्या सभेवर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- IPL 2022 RR vs MI : हुश्श..जिंकलो! रोहितला मिळालं बर्थडे गिफ्ट; मुंबई इंडियन्सचा पहिला विजय!