मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा उद्रेक झाला असून या लाटेत आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत. राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन आणि इतर आवश्यक औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली असून अनेक रुग्णांना आपला प्राण गमवावा लागत आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारला मदतीची साद घातली असून केंद्राने देखील मदतीचा हात दिला आहे. मात्र, महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज आहे. त्यामुळे आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पुढाकार घेतला आहे.
शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शरद पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत. पवारांच्या निर्देशांनुसार महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची प्रमुख संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून राज्यातील साखर कारखान्यांना पत्र पाठवण्यात आले आहे.
वाचा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कडून साखर कारखान्यांना पाठवण्यात आलेलं पत्र –
प्रति
अध्यक्ष / कार्यकारी संचालक
विषयः कारखान्यांनी ऑक्सिजनची निर्मीती व पुरवठा करणेबाबत
महोदय,
आपणा सर्वांना माहितच आहे की सध्या कोविडच्या दुस-या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे व कोविड पेशंटला ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागलेली आहे. यापूर्वी प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व साखर कारखान्यांनी भरीव मदत व सहकार्य केलेले आहे.
सद्य परिस्थिती लक्षात घेता संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी असे निर्देशित केले आहे की ज्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अद्याप चालू आहे व तसेच ज्यांचे सहविजनिर्मिती व आसवणी प्रकल्प कार्यरत आहेत अशा प्रकल्पांमध्ये मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती करावी व ज्या कारखान्यांचा गाळप हंगाम संपलेला आहे अशा कारखान्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी ऑक्सिजन किटचा पुरवठा रुग्णांना अथवा कोविड सेंटरला करावा. तसेच कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारावेत व त्यासाठी कारखान्यांनी सध्याची साधनसामुग्री व मनुष्यबळाचा वापर करता येईल.
ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभा करावयाचे झाल्यास त्यासाठी वाफ व वीजेची गरज भासते. साखर कारखान्यांमध्ये वाफ आणि वीज ही कारखाना चालू असताना उपलब्ध होऊ शकते. म्हणून कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारणी हाती घ्यावेत व त्याकरिता कारखान्यांना उपलब्ध साधनसामुग्री व मनुष्यबळ याचा उपयोग करता येणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचा खर्चसुध्दा कमी होईल.
सध्याची कोविडची परिस्थिती ही भयावह असून रुग्णांना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज भासत आहे. राज्य शासन व केंद्र शासन ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहेतच, तथापि आपल्या सर्व साखर कारखान्यांनी यामध्ये पुढाकार घेऊन उपलब्ध साधनसामुग्री, मनुष्यबळ व गरज भासल्यास आवश्यक ते भांडवल घालून ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणे अत्यंत आवश्यक झालेले आहे. कारखान्यांना आसवणी प्रकल्पामध्ये इथेनॉल शुध्द करण्याचा आणि कार्बनडायऑक्साईड वेगळा करण्याचा अनुभव आहे. याठिकाणी फक्त ऑक्सिजन वेगळा करण्याचा प्रकल्प उभारण्याचे आहे. या संदर्भात व्हॅक्युम प्रेशर स्वींग अॅडसॉर्पशन प्रोसेसची माहिती घेऊन यापुढे त्वरीत कार्यवाही करावी, अशी नम्र विनंती आहे. या अनुषंगाने सर्व कारखाने आपल्या कारखान्यांमध्ये ऑक्सिजन निर्मिती व पुरवठा करतील याची खात्री आहे. कळावे,
आपला विश्वास,
(शिवाजीराव देशमुख)
महत्वाच्या बातम्या
- भाजपचे किती लोकप्रतिनिधी मला भेटतात हे एकदा तपासा, अजितदादांचा चंद्रकांतदादांना टोला
- राज्यात पुन्हा एकदा प्रवास करण्यासाठी ई- पासची गरज, महाराष्ट्र पोलिसांची माहिती
- प्रसिद्ध अभिनेता अमित मिस्त्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
- धक्कादायक बातमी : ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने दिल्लीत २५ रुग्णांचा मृत्यू
- प्रसिद्ध अभिनेता अमित मिस्त्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन