Raj Thackeray | मुंबई: अंधेरी पोट निवडणुकीत भाजप पक्षाने माघार घेतली आहे. यापुर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना पत्र लिहित माघार घेण्याची विनंती केली होती. अशातच भाजप पक्षाने माघार घेतल्यामुळे राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.
राज ठाकरे यांचं देवेंद्र फडणवीस यांना पत्र –
यावेळी, काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात ह्याबद्दल आपले, आपल्या सहकाऱ्यांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतशः आभार, असं त्यांनी त्यांच्या पत्रात लिहिलं आहे.
चांगली, सकारात्मक राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. अशी राजकीय संस्कृती असावी, वाढावी आणि राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी असा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही कायम करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात ह्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुनःश्च आभार !. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे यांनी ट्विट करत हे पत्र शेअर केलं आहे. यावेळी, अंधेरी (पूर्व) पोट-निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात ह्याबद्दल आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार. उमद्या राजकीय संस्कृतीसह राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी हीच आमची धारणा !, असं त्यांनी कॅप्शन लिहिलं आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित अंधेरी पोट निवडणुकीत माघार घेण्याची विनंती केली होती. यावेळी, आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) ह्या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कै. रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल, असं राज ठाकरेंनी (Raj Thackeray) त्यांच्या पत्रात म्हटलं आहे.
माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं. मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेंव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेंव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रध्दांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं. असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्विकार कराल, असं देखील ठाकरेंनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Maharashtra Rain Update | राज्यात सर्वत्र परतीचा पावसाचे थैमान, तर ‘या’ जिल्ह्यात येलो अलर्ट
- Sanjay Shirsat | संजय शिरसाट यांना ह्रदयविकाराचा झटका, उपचारासाठी मुंबईला रवाना
- Pune Rain | पुण्यात पावसाने क्षणात जनजीवन विस्कळीत! झोप उडाली, गाड्या वाहून गेल्या
- Uddhav Thackeray | “… म्हणून भाजपने माघार घेतली”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
- Shinde-Fadanvis | “माझ्या जीवाला काही झालं तर शिंदे-फडणवीस जबाबदार”, ठाकरे गटातील खासदाराचा खळबळजनक आरोप