Shambhuraj Desai | मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील वाद वाढत चालला आहे. दोन राज्यांमधील हा वाद पाच दशकांहून अधिक जुना आहे. त्यामुळे राजकारणही होत आहे. आज (मंगळवार) महाराष्ट्रातील दोन मंत्री कर्नाटकातील बेळगावी येथे जाणार होते, मात्र त्यांचा दौरा पुढे ढकलावा लागला. महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) हे लोकांशी चर्चा करण्यासाठी कर्नाटकातील बेळगावी येथे जात होते. पण कर्नाटक सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत त्यांना बेळगावी जाण्यास नकार दिला. यावर शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
शंभूराज देसाई म्हणाले, “महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीचे सदस्य-समन्वयक मंत्री म्हणून सीमाभागातील मराठी बांधवांशी संवाद साधण्यासाठी चंद्रकांत पाटील आणि मी ३ डिसेंबर रोजी बेळगावला जाणार होतो. परंतु तेथील मराठी बांधवांनी ३ डिसेंबरऐवजी ६ डिसेंबर रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आयोजित कार्यक्रमास येण्याची विनंती केली होती. त्यानुसार आम्ही ६ डिसेंबर म्हणजे आज बेळगावला जाणार होतो. या दौऱ्याबाबत आम्ही कर्नाटक सरकारला कळवले होते. आम्ही राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून बेळगावला जाणार होतो. मात्र, कर्नाटक सरकारने या नियोजित दौऱ्यास वेगळे वळण देऊन कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला.”
“कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले, की कर्नाटक सरकार आम्हाला बेळगावला येऊ देणार नाही. वास्तविक आम्हाला कर्नाटकला जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. मात्र, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमासाठी आम्ही बेळगावला जाणार होतो. परंतु आमच्या जाण्याने उद्भवणाऱ्या संघर्षाच्या स्थितीने महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाला गालबोट लागू नये, अशी आमची भूमिका आहे. महापरिनिर्वाण दिनी तिथे आंदोलन किंवा तणावाची स्थिती निर्माण होऊ नये, यासाठीच आजचा दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे,” असे शंभूराज देसाई म्हणाले.
आम्ही बेळगावचा दौरा रद्द केलेला नाही, तर तो केवळ पुढे ढकलला आहे. लवकरच आम्ही बेळगावला जाऊ. याबाबत मा. चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत चर्चा करून दौरा निश्चित करू, असे देखील देसाई यांनी स्पष्ट केले.
“सीमावादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी आवश्यक ते सर्व पावले राज्य सरकार उचलत आहे. या प्रश्नी राज्याची उच्चाधिकार समिती सक्रीय आहे. सीमावादासंदर्भात लवकरच राज्याचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सीमाप्रश्न सनदशीर मार्गाने सोडविण्याचा आम्ही कटिबद्ध आहोत. सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे”, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या :
- Health Care | दिवसभर कोमट पाणी पिल्याने मिळू शकतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे
- Supriya Sule | “साहेबांनी कर्नाटक पोलिसांच्या लाठ्या झेलल्या पण…”, सुप्रिया सुळेंनी सांगितली ‘ती’ आठवण
- Maharashtra Karnataka Border Dispute | आम्ही बेळगाव दौरा पुढे ढकलला, रद्द केलेला नाही – शंभूराज देसाई
- Sudhir Mungantiwar | “शिवरायांच्या जगदंबा तलवारीसह वाघनखंही महाराष्ट्रात आणणार”; सुधीर मुनगंटीवार यांची मोठी घोषणा
- Ajit Pawar on Karnataka CM | “तक्रार काय करता? आरे ला का रे उत्तर द्या” ; अजित पवारांचा मंत्र्यांना सल्ला