मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा पठण करण्याचा आक्रमक पवित्रा घेतला होता. आज उद्धव ठाकरे यांची मुंबईत सभा होणार आहे आणि आजच दिल्लीतल्या एका हनुमान मंदिरात जाऊन राणा दाम्पत्य महाआरती करणार आहेत. दरम्यान या वादावर आता नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या विद्या चव्हाण यांनी नवनीत राणांवर वादग्रस्त शब्दांत टीका केली आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा आज दिल्लीत हनुमान मंदिरात महाआरती करणार असल्याचे जाहीर केले होते. यावरच आता विद्या चव्हाण यांनी नवनीत राणांवर टीका केली आहे. चव्हाण म्हणाल्या, “कुणीही उठसूट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा अपमान करतो, हे कितपत योग्य आहे? आणि कोण आहेत या नवनीत राणा? त्या आधी बारमध्ये काम करत होत्या. त्यांच्याबद्दल सर्वांना माहित आहे. खोटं जात प्रमाणपत्र दाखवून त्या खोट्या खासदार झाल्यात. त्यांना एवढं महत्त्व द्यायची गरज नाही. माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी हे दाम्पत्य असा प्रकार करतंय.”
तसेच विद्या चव्हाण यांनी नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांच्यावरही टीका केली आहे. निवडणुकीच्या वेळी मतं मिळवण्यासाठी त्यांनी मतदारांना वेगवेगळी आमिषं दाखवल्याचंही त्यांनी सांगितलं. चव्हाण म्हणाल्या, “राणा दाम्पत्य अमरावतीत काय करत होतं, हे सगळ्यांना माहित आहे. रवी राणांनी निवडणुकीच्या वेळी मतदारांना कुकर वाटले. पण कुकरला झाकणच नव्हतं. महिला त्यांना विचारायला गेल्या. तर रवी राणा म्हणाले की मला मतं दिल्यानंतर तुम्हाला झाकणं देतो. ”
महत्त्वाच्या बातम्या :