मुंबई : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे आसाममधील एका हॉटेलमध्ये एकूण ४० आमदारांसह उपस्थित आहेत आणि सरकार स्थापन करण्याच्या त्यांच्या आग्रहावर ठाम आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे यांनी एकतर भाजपसोबत सरकार बनवावे किंवा स्वत:कडे लक्ष द्यावे, असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. या सर्व नाराजी नाट्यात विदर्भातील बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख यांचे नाव चांगलेच चर्चेत होते. त्यांना मारहान झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. यावर देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला.
नितीन देशमुख म्हणाले, “माझी तबीयत चांगली आहे. मी रात्री ३ वाजता हॉटेलमधून निघालो. रस्त्यावर मी उभा होतो. मात्र १०० ते २०० पोलीस माझ्या मागे होते. ते मला कोणत्याच गाडीत बसू देत नव्हते. त्यांनी मला जबरदस्तीने रुग्णालयात नेले. अटॅक आला म्हणून माझ्यावर उपचार करायचे आहेत, असे सांगण्यात आले. मात्र मला कोणत्याही प्रकारचा अटॅक आला नव्हता. माझा बीपी सुद्धा वाढला नव्हता. त्यांचा हेतू चुकीचा होता. २०, २५ लोकांनी जबरदस्तीने माझ्या दंडामध्ये इंजेक्शन दिले. माझ्या शरीरावर चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया करण्याचे षडयंत्र त्या लोकांच होत. मी उद्धव साहेबांचा शिवसैनिक असून उद्धव साहेबांसोबतच आहे.”
दरम्यान, महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होत असताना उद्धव ठाकरे विधानसभा बरखास्त करू शकतात, असे संकेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे, “महाराष्ट्रातील राजकीय खळबळ विधानसभा बरखास्त करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.” त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे चर्चांना उधान आले आहे.
यापूर्वी, बुधवारी सकाळी बोलतांना राऊत म्हणाले होते, “जास्तीत जास्त करून सत्ता जाईल, पण पक्षाच्या प्रतिष्ठेशी तडजोड करणार नाही. शिंदे यांनी कोणतीही अट घातली नाही. पक्षाच्या उभारणीत त्यांचे योगदान आहे. आम्ही सतत संपर्कात असून सर्व आमदार शिवसेनेतच राहणार आहेत.ऑपरेशन लोटस यशस्वी होणार नाही.”
सायंकाळपर्यंत आणखी १० आमदार उद्धव ठाकरेंविरोधात बंड करून शिंदे गटात सामील होऊ शकतात, असा दावा सूत्रांनी केला आहे. तसे झाल्यास बंडखोर आमदारांची संख्या ५० होऊ शकते. त्याचवेळी महाराष्ट्रात सरकार संकटात सापडल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही सावध झाली आहे. काँग्रेस नेते कमलनाथ मुंबईत आमदारांशी चर्चा करणार आहेत, तर शरद पवारही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भविष्याची रणनीती ठरवणार आहेत.
दरम्यान, आता मुंबईत बॅनरबाजी देखील दिसून येत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घराबाहेर बॅनर लावण्यात आले असून, त्यात एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. तेरा घमंड तो चार दिन का है पगले हमारी बादशाही तो खानदानी है,’ असे बॅनरवर लिहिले आहे.
शिवसेनेचे बंडखोर आमदार बुधवारी पहाटे चार्टर्ड विमानाने गुवाहाटी येथे पोहोचले. महाराष्ट्राचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सुरतहून गुवाहाटी गाठल्यानंतर आपल्याला ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. दरम्यान, महाराष्ट्राचे ४१ बंडखोर आमदार गुवाहाटीला पोहोचले असून एका आलिशान हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्यापैकी ३४ शिवसेनेचे तर सात अपक्ष आमदार आहेत.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि काही आमदारांनी पक्षाविरोधात बंड करून सुरतमधील हॉटेल गाठल्यानंतर मंगळवारी पक्षाने आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये हलवले. पक्षाच्या आमदारांना मुंबईतील विविध हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. आमदारांचे अपहरण होण्याच्या भीतीने हे कृत्य करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :