Explained Tata Airbus Project | वेदांता – फॉक्सकॉन या मोठ्या प्रकल्पानंतर C-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ (Tata AirBus Project) महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. IAF सौद्यांतर्गत महाराष्ट्रात सुरू होणारा टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमधील वडोदरा येथे स्थलांतरित झाला आहे. हा प्रकल्प नागपूर येथे होणार होता. नितीन गडकरी आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील याबाबत सांगितले होते. मात्र अचानक हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी वडोदरा येथे या प्लांटचे उद्घाटन करणार आहेत. शिंदे -फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या १ लाख ८० हजार कोटींच्या ४ प्रकल्पांपैकी ३ गुजरातला नेण्यात आले. महाराष्ट्रातील दोन नियोजित प्रकल्पांना केंद्र सरकारनेच मंजुरी दिली नाही. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार झोपले का?, असा प्रश्न निर्माण होत आहे. ३ मोठे प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रातील युवकांचा रोजगार नरेंद्र मोदी आणि शहा यांनी गुजरातला दिला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होत आहे.
शिंदे-फडणवीस सरकार हे प्रकल्प तत्कालीन सराकमुळे गेल्याचा आरोप करत आहे. मग तीन महिने झाले हे सरकार गोट्या खेळण्यात व्यस्त होते का?. प्रकल्प गुजरातलाचं का जात आहेत. या भारत देशात दुसरे राज्य नाही का? गुजरात निवडणूक आली तर महाराष्ट्राला उपाशी ठेवून शिंदे-फडणवीस सरकार गुजरात्यांचे पोट भरत आहे का?, असे प्रश्न महाराष्ट्रातील नागरिक उपस्थित करत आहेत.
महाराष्ट्रातील दीड लाख तरुणांचा रोजगार गुजरात्यांना-
गुजरातमध्ये हिसकावून नेण्यात आलेल्या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील दीड लाख तरुणांचा रोजगार गेला आहे. टाटा एयरबस प्रकल्पामुळे ६ हजार रोजगार उपलब्ध होणार होते. तर वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्पामुळे १ लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली असती. तसेच बल्क ड्रग पार्क प्रकल्पांसाठी विचाराधीन असलेलं महत्त्वाचं राज्य होतं. यामधून ५० हजार लोकांना रोजगार मिळाला असता. पण १ सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने यासाठी हिमाचल प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेशला मान्यता दिली. महाराष्ट्राला यामधून वगळण्यात आले. अशाच प्रकारे औरंगाबादमधील ऑरिक सिटीमध्ये होणारा मेडिकल डिव्हाइसेस पार्कला देखील केंद्र सरकारने मान्यता दिली नाही. हा प्रकल्प तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये हलवण्यात आला आहे. या प्रकल्पातून ३ हजार रोजगार निर्मिती होणार होती.
विधानसभा निवडणुकीमुळे प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात आले –
गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात होणारे प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्याचे नेटकरी म्हणत आहेत. एकनाथ शिंदेनी हे प्रकल्प गुजरातला दिले, असा आरोप नेटकरी करत आहेत. गुजरातमधील निवडणूकीसाठी राज्यातील महानगपालिकांच्या निवडणुका लांबवल्या जातात त्यामुळे गुजरातला एवढं महत्व का?, असा प्रश्न निर्माण होत आहे. महाराष्ट्रात बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, ओलो दुष्काळ अशा समस्या असतांना, ऐवढे मोठे प्रकल्प राजकारण्यांच्या नाकाखालून गुजरातला जातात कसे, त्यामुळे चौकशीची मागणी होत आहे. महाराष्ट्र सरकार मोदी-शहांचे गुलाम आहेत का? गुजरातसाठी महाराष्ट्राचा बळी का दिला जातोय, असा सवाल महाराष्ट्रातील बेरोजगार तरुण आज शिंदे-फडणवीसांना विचारत आहे.
मोदी आणि शहा यांनी गडकरी आणि सांमत यांना पद्धतशीरपणे कोलले का?
राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. जरी तत्कालीन सरकामुळे प्रकल्प गेले असतील. तर शिंदे-फडणवीस सरकारने प्रयत्न का नाही केले? नितीन गडकरी आणि उदय सामंत यांनी टाटा एयरबस प्रकल्प नागपूर येथे मिहानमध्ये होणार असल्याचे सांगितले होते. तरी देखील प्रकल्प गुजरातला कसा गेला? मोदी आणि शहा यांनी गडकरी आणि सांमत यांना पद्धतशीरपणे कोलले का? नरेंद्र मोदींवर स्वत:पेक्षा जास्त विश्वास असलेले एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी मोदींना विनंती का नाही केली. की फडणवीस – आणि शिंदेंना मोदी महत्व देत नाहीत, याचा सरकारने खुलासा करावा.
नागरिकांचा संताप- गुजरात एक वेगळा देश होणार आहे का?
सोशल मीडियावर देखील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. सरकार शिवसेनेला कसा धडा शिकवला हेच सांगण्यात व्यस्त आहेत. शिंदे-फडणवीस सरकार फक्त तत्कालिन सरकारवर खापर फोडण्याच व्यस्त आहे.
डायमंड उद्योग सूरतला आहे. गुजरातमध्ये बऱ्यापैकी या उद्योगाने जम बसवला आहे. सराफा व्यापारही तिथे स्थलांतरित होत आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचं इंटरनॅशन ट्रेडिंग गुजरातमधून करण्याची चर्चा आहे. हे सर्व पाहिल्यानंतर आता गुजरात एक वेगळा देश होणार आहे का? अशी शंका आमच्या मनात निर्माण झाली आहे, काँग्रसते सतेज पाटील यांनी म्हटले आहे.
सचिन सावंत म्हणाले, “देशात तीन सरकार गुजरातच्या हितासाठी कार्यरत आहेत. मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार, दुसरे गुजरात सरकार आणि तिसरे शिंदे फडणवीस सरकार! गेल्या काही महिन्यांपासून ज्या वेगाने गुजरातकडे महाराष्ट्रात होऊ घातलेले प्रकल्प चालले ते पाहता जितका काळ हे राहतील तितका महाराष्ट्र कंगाल होईल.”
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “तुम्ही(भाजप) म्हणत आहात हा प्रकल्प एक वर्षापूर्वीच गेला. नंतर तुम्ही म्हणत आहात की आम्ही हा प्रकल्प नागपूरलाच करणार आहोत आणि नंतर म्हणत आहात की उपमुख्यमंत्री मन वळवण्यात कमी पडले. त्यांच्या मंत्रिमंडळातील प्रत्येक व्यक्ती काहीतरी वेगळं बोलते. त्यामुळे मी प्रचंड गोंधळले आहे. मी विरोधक म्हणून विचारत नाही. मी या राज्याची एक नागरिक आहे. या देशाची एक नागरिक आहे आणि एक लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे मला वाटतं हा आपल्या सगळ्यांनाच अधिकार आहे की नक्की सत्य काय आहे. त्यामुळे टाटा एअर बस प्रकरणात सरकारने वस्तूस्थिती समोर आणावी. राज्यातील गुंतवणूक दुसरीकडे कशी जाते हा नागरिक म्हणून प्रश्न पडतो.”
भास्कर जाधव म्हणाले, “वेदांता फॉक्सकॉनपेक्षा मोठा प्रकल्प आणण्यापूर्वीच नागपूरला होणार टाटा एअरबस प्रकल्पही गुजरातला देऊन शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील लाखो बेरोजगारांची स्वप्ने उध्वस्त केली आहेत. हे सरकार आल्यानंतरच मोठमोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत, भाजपाला यासाठीच महाराष्ट्रात सत्ता हवी होती का?” तसेच, C- 295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प तब्बल २२ हजार कोटींचा असल्याचं समजतं आहे. या प्रकल्पाचे ३० ऑक्टोबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
शिंदे सरकारच्या काळात महाराष्ट्रातून इतर राज्यात गेलेले प्रकल्प-
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प-
महाराष्ट्रात तब्बल दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून सुमारे दीड लाख नोकऱ्या निर्माण करण्याची क्षमता असलेला वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला. सेमीकंडक्टर म्हणजेच मायक्रोचीप बनवण्याचा हा प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्यासाठी तळेगाव या जागेचा पर्याय देखील देण्यात आला होता. या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची होती. एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले डिस्प्ले फॅब्रिकेशन, ६३ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सेमीकंडक्टर्स आणि ३८०० कोटी रुपयांचा चाचणी प्रकल्प होणार होता. सेमीकंडक्टरच्या प्रकल्पाची चर्चा करण्यासाठी जुलै महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि फॉक्सकॉन आणि वेदांता कंपनीचे प्रतिनिधी यांच्यात बैठक पार पडली होती. मात्र हा प्रोजेक्ट गुजरातला गेला.
बल्क ड्रग पार्क प्रकल्प-
‘बल्क ड्रग पार्क’ हा प्रकल्प रायगडमध्ये येणार होता. पण आता गुजरातमधील भरुच इथं हा ‘बल्क ड्रग पार्क’ होणार आहे. या प्रकल्पाची मागणी महाराष्ट्रानं पहिल्यांदा केली होती. सप्टेंबरमध्ये हा प्रकार घडला होता. सुमारे ३००० कोटी रुपयांच्या आणि सुमारे ५०००० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण करण्याची क्षमता असलेल्या बल्क ड्रग पार्क प्रकल्पासाठी महाराष्ट्र हा मुख्य दावेदार यापैकी एक होता.
मेडिकल डिव्हाइसेस पार्क-
औरंगाबाद येथील ऑरिक सिटी येथे ४२४ कोटींचा वैद्यकीय उपकरणे पार्क प्रस्तावित होता. वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प आणि बल्क ड्रग पार्कनंतर महाराष्ट्रातून इतर राज्यात गेलेला हा तिसरा मोठा प्रकल्प होता. ऑरीक सिटी बिडकीनमध्ये वैद्यकीय उपकरणे पार्क उभारण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळून लावला. ‘प्रमोशन ऑफ मेडिकल डिव्हायसेस पार्क’ योजनेअंतर्गत हा प्रस्ताव २०२० मध्ये केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत फार्मास्युटिकल्स विभागाकडे पाठवण्यात आला होता. रसायने आणि खते मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या योजनेकरीता एकूण १६ राज्यांनी प्रस्ताव पाठवला होता, यापैकी चार राज्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश ही निवडलेली राज्ये आहेत. दुर्दैवाने यात महाराष्ट्राचा समावेश करण्यात आला नाही.
टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही गुजरातला –
नागपुरात साकारण्याचा प्रस्ताव असलेला संरक्षण क्षेत्रातील टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही गुजरातला गेला आहे. हा प्रकल्प नागपुरातील मिहानमध्ये साकारण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला होता. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सप्टेंबरमध्ये याची घोषणाही केली होती.
महत्वाच्या बातम्या :
- T20 World Cup । झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा खेळाडू ढसाढसा रडला, व्हिडिओ व्हायरल
- Maharashtra Weather Update | राज्यात थंडीची चाहूल, तर कोकणात सर्वत्र पसरली धुक्यांची चादर
- Saamana । सामानाच्या अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकांची बरसात
- Bhaskar Jadhav | “शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील लाखो बेरोजगारांची स्वप्ने उध्वस्त केली आहेत”
- Ajit Pawar | टाटा एअरबस प्रकल्पावरून अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल, म्हणाले…