औरंगाबाद : सध्या औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करण्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार राजकारण सुरु असताना पाहायला मिळत आहे. या मुद्यावरूनच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
नामांतराच्या विषयावरुन राजकारण करणं आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी बंद करावं. लोकांना नामांतर वगैरे काही नको आहे. त्यांना पाणी हवंय. मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राशी काहीही देणंघेणं नाहीये. तुम्ही औरंगाबादला येणार असाल तर पाणी घेऊन या. महत्त्वाचं म्हणजे औरंगाबादला एकटे या आणि नामांतर विषयावर बोलून दाखवावं, लोक तुम्हाला हंड्याने मारतील, असं इम्तियाज जलील म्हणाले.
तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना इम्तियाज जलील म्हणाले, औरंगाबादेतील भाजप नगरसेवक असणाऱ्या वॉर्डात जा, तिथे आमच्या आया-बहिणींना भेटा आणि त्यांना विचारा, नामांतर हवं की पाणी हवं? ते तुम्हाला नामांतराच्या विषयावरुन शिव्या घालतील. पाणाच्या मुद्द्यासाठी आग्रह धरतील.
औरंगाबादच्या नामांतरावरुन उद्धव ठाकरे आणि फडणवीस काय म्हणाले?
“संभाजीनगर नामांतर करायची गरज काय? आहेच ते संभाजीनगर. नामांतर करायची गरजच काय आहे?, असा सवाल करत औरंगाबाद नामांतर वाद मुख्यमंत्र्यांनी निकाली काढला. बीकेसी मैदानावर घेतलेल्या सभेत त्यांनी औरंगाबादच्या नामांतरावर भाष्य केलं. मी आताही औरंगाबादला संभाजीनगर म्हणतो, नामांतर करण्याची गरज नाहीये”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, औरंगाबादचं संभाजीनगर करण्याची गरज काय? ओ खैरे, व्हा आता बहिरे. औरंगाबादचा केलाय कचरा, भाजपचं सरकार येईपर्यंत औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर विसरा”, अशा शब्दात नामांतरच्या मुद्द्यावरुन फडणवीसांनी सेनेवर हल्ला चढवला आहे.
महत्वाच्या बातम्या –