सांगली : ब्राह्मण समाजाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर राज्यभरात टीका होत आहे. दरम्यान, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मिटकरींवर जहरी टीका केली आहे. ते सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलत होते.
“अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाच्या आहे. तोडा फोडा अशी नीती राष्ट्रवादीची आहे. प्रत्येक समाजाची नेते पक्षात घ्यायची, जातीयवाद करायचा आणि पवार साहेब आपले तारणहार आहेत. हे समाजाला समजावण्याचे काम राष्ट्रवादीमधील नेते करतात,” अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
आमची पांडवाची सेना या कौरवांचा नाश करेल
महाविकास आघाडी हे विकास कामावर बोलायला तयार नाही. पण एक शकुनी मामा सतरंजी वरती चाल खेळून दुसरीकडे लक्ष केंद्रित करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे. ज्या बाजूला शकुनीमामाचा सुळसुळाट असतो त्याची सेना कौरवाची सेना असते. आमची पांडवाची सेना या कौरवांचा नाश करेल, असा इशारा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.
केवळ फालतूगिरी सुरू
सदाभाऊ खोत म्हणाले, “जागर शेतकऱ्याचा आक्रोश बहुजनांचा हे राज्यव्यापी अभियान 29 एप्रिल पासून कोकणातून सुरू करत आहोत. राज्यात शेतकऱ्याच्या आत्महत्या, लोडशेडिंग मोठ्या प्रमाणात वाढले आहे. केवळ फालतूगिरी सुरू आहे.”
“हे सरकार भरतीवर बोलत नाही. आरोग्य भरतीमध्ये घोटाळा केला. हे सर्व जनतेसमोर या अभियानातून मांडण्यात येणार असल्याचे खोत यांनी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वेळ नाही. एक आजीबाई आली आणि डायलॉग बाजी केली आणि मुख्यमंत्री त्यांना भेटायला गेले. या महाराष्ट्रामध्ये अनेक आज्जीबाई आहेत. त्यांचे डोळे पुसण्यासाठी वेळ मिळेल का?,” असा सवाल खोत यांनी मुख्यमंत्र्यांना केला.
आघाडी सरकार म्हणजे खाकी आणि खादीची युती
“आघाडी सरकार म्हणजे खाकी आणि खादीची युती आहे. सरकारमध्ये गुंडगिरी उफाळून आली आहे. या सर्व विषयावर जनतेमध्ये जाऊ आणि संघर्ष उभा करू. हनुमान चालीसेवरुन राणा यांच्यावर गुन्हे दाखल केले जाते. त्यांच्या घरावर ज्या गुंडांनी हल्ला केला. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाहीत. मग पवार साहेबांच्या घरावर जे कर्मचारी गेले त्यांच्यावर का गुन्हे दाखल केले. ते सर्व सामान्य लोक होते. त्यामुळे हे राज्य गुंडाराज्य झाले आहे,” अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
महत्वाच्या बातम्या :